शर्मिला जगताप
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची 25 नोव्हेंबरला पुण्यतिथी होती. राजकारणी म्हणून त्यांनी भारतीय राजकारणात मानाचा ठसा उमटवला. तरी त्यांच्या साहित्यिक अंगाचीही ओळख करून घेऊया. “कृष्णाकाठ’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र. इतरही त्यांची साहित्यसंपदा आहे. यातील “सह्याद्रीचे वारे’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात महाराष्ट्रराज्य निर्मितीनंतरच्या काळातील यशवंतरावांच्या भाषणांचा मुख्यतः समावेश केलेला असला तरी द्विभाषिक मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली काही भाषणेही यात आहेत. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाच वर्षांच्या काळात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी जे विचार मांडले ते या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत.
पाच वर्षांचा काळ हा राष्ट्राच्या, समाजाच्या आणि व्यक्तीच्या जीवनातील फार मोठा कालखंड आहे असे नाही. परंतु इतिहासाची गती कालाच्या गतीने नियंत्रित होत नसते. वर्षानुवर्षे संथपणाने चालणारा इतिहासाचा प्रवाह क्षणार्धात अशा काही वेगाने उफाळून वाहू लागतो की, त्यामुळे व्यक्तीचे, समाजाचे व राष्ट्राचे जीवन आमूलाग्र बदलून जाते.
या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या जीवनात असेच विलक्षण क्रांतिकारक बदल घडून आलेले आहे. या ऐतिहासिक काळात यशवंतरावांनी प्रदर्शित केलेल्या महत्त्वांच्या विचारांचे प्रतिबिंब या पुस्तकात आढळते. एका अर्थाने ही त्यांची प्रातिनिधिक भाषणे आहेत असे म्हणता येईल. लोकशाही आणि राष्ट्रीय एकता यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उत्कर्षाचे विचार त्यांनी या भाषणांतून मांडलेले आहेत. त्यांच्या मते, महाराष्ट्राचे भावनिक ऐक्य व त्याचा आर्थिक विकास यावरच महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून असून ते घडवून आणण्याचे महाराष्ट्र राज्य हे फार मोठे साधन आपणास प्राप्त झाले आहे.
आर्थिक विकास हा त्यांच्या विचारांचा मुख्य गाभा असून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या अनेक दिशा त्यांनी या भाषणांतून दाखविल्या आहेत. तसेच महाराष्ट्राच्या सध्याच्या विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या दृष्टीने शिक्षणाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असून सहकार हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया मांडला आहे. याबरोबरच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शनही वाचकांना या पुस्तकातून घडते. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या संदर्भातील त्यांची भाषणे “नवे राज्य’ या भागात समाविष्ट केली आहेत.
या भाषणांत नव्याने अस्तित्वात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विशिष्ट परिस्थिती, त्याच्यापुढे असलेल्या महत्त्वाच्या समस्या आणि त्याची प्रेरकशक्ती यावर भर देण्यात आला आहे. नव्या महाराष्ट्राच्या आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाच्या दिशा दाखविणारी त्यांची भाषणे “नवी क्षितिजे’ या भागात आहेत. यामुळे नव्या महाराष्ट्राचे चित्र वाचकांपुढे उभे राहते. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना निश्चितच प्रेरणा मिळते.