अकोले – निळवंडे धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडत असल्याने उजव्या उच्चस्तरीय कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडावे यासह इतर मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धरण पायथ्याशी अडवल्याने आंदोलकानी बॅरिगेटस उलथवून पोलिसांना हुलकावणी देऊन धरणाजवळ जाऊन आंदोलन केले. आंदोलकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर 30 ऑक्टोबरपर्यंत उजव्या उच्चस्तरीय कालव्याला पाणी सोडण्याचा शब्द आंदोलनकर्त्याना मंत्री विखे यानी दिला
या वेळी शेतकरी नेते डॉ. अजित नवले, सुनीता भांगरे, युवा नेते अमित भांगरे, मधुकर तळपाडे, मीनानाथ पांडे, वसंत मनकर, रवींद्र गोर्डे, बाळासाहेब भोर आदींसह विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते. या वेळी डॉ. नवले म्हणाले की, धरणे आमच्या तालुक्यात, जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या गेल्या, त्यासाठी पुनर्वसन आमच्या तालुक्यात तर आमच्या शेतकऱ्यांना थोडे पाणी द्यायला काय हरकत आहे. निळवंडे धरणातील पाणी रिकामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आमचा कालव्याला पाणी सोडण्यास विरोध नाही. मात्र, उजव्या बाजूच्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वंचित राहत आहे. उजव्या कालव्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यानुसार आज जर पाणी कालव्यातून वाहून गेले, तर उजव्या कालव्याच्या चाचणीलाही पाणी राहणार नाही. या वेळी मंत्री विखे यांच्यासमवेत माजी आ. वैभव पिचड, शिवाजी धुमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आकडेवारीसह खुलासा
डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने उजव्या कालव्याच्या चाचणीला पाणी शिल्लक राहणार नाही ही भीती मनातून काढून टाका चुकीची माहिती समोर आली असून, आकडेवारीसह मंत्री विखे यांनी खुलासा केला.