भाजपाचा आणखी एक मित्रपक्ष दुरावला
नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायदा (का) राष्ट्रीय नागरीकत्व सुची (एनआरसी) या बाबतची भूमिका आणि जागा वाटपावरून झालेल्या मतभेदामुळे शिरोमणी अकाली दलाने दिल्ली विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरोमणी अकाली दलाचे मनजितसिंग सरसा आज पत्रकार परिषदेत म्हणाले, एनआरसीची अंमलबजावणी होऊ नये ही अकाली दलाची ठाम भूमिका आहे. या कायद्यातून कोणत्या एका धर्माला वगळावे, हे आम्हाला मान्य नाही. सर्व धर्माच्या व्यक्तीचा समावेश करावा या सुखबीर बादल यांच्या भूमीकेला पक्षाचा पाठींबा आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर एनडीएतील काही मित्रपक्षांनी भाजपविरोधात आवाज उठवला होता. आता भाजपचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलाने दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला साथ द्यायची नाही, असे निश्चित केले आहे. दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारीला निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि अकाली दल यांच्यातले मतभेद समोर आले.
भाजपा आणि शिरोणी अकाली दल याच्यातील वाद चिन्हामुळे ताणला गेला. 2015 मध्ये अकली दलाचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढले होते. मात्र त्यांचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. आता अकली दलाला स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढवायची होती.