किरण जगताप
गुंड यांना कोठे संधी मिळणार?
विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी गुंड अडून बसले होते. रोहित पवार यांच्या कार्यक्रमांना गुंड उपस्थित राहत नव्हते. अखेर पक्षाकडून रोहित पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले. अजित पवार यांच्या शब्दावर त्यांनी उमेदवारीचा हट्ट मागे घेतला. कर्जतच्या सभेत अजित पवारांनी गुंड यांना योग्य ठिकाणी संधी देण्याचा शब्द दिला होता. आता सर्व परिस्थिती अनुकूल असल्याने गुंड यांना आता कोठे संधी मिळणार ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
कर्जत – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होऊन सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संधी मिळाली नाही. आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार यांना संधी मिळणार का? याची प्रतीक्षा आहे. कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांनी बाजी मारली असली तरी कर्जत – जामखेड मतदारसंघातील कित्येक नेते तसेच कार्यकर्ते अजित पवारांना मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
या मतदारसंघावर पवारांचा इम्पॅक्ट आहे. अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास या भागावर अधिक लक्ष केंद्रित करणे त्यांना सोयीचे जाणार आहे. अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांचा कर्जत तालुक्यात मोठा जनसंपर्क तयार झालेला आहे. कारखान्यांमध्ये कर्जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर युवकांना रोजगार मिळालेला आहे.
ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड संपली असून शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागला आहे.सिद्धटेक, भांबोरा, गणेशवाडी, खेड या भीमा पट्ट्यात अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांची कर्जत तालुक्यात एंट्री झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील अनेक नेते, कार्यकर्ते त्यांच्या जवळून संपर्कात आले. जिल्हा परिषदेच्या कुळधरण गटावर अनेक दशके निर्विवाद वर्चस्व असलेले गुंड घराण्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत.
राशिनचे युवा नेते श्याम कानगुडे हे अनेक वर्षांपासून त्यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे नेते नानासाहेब निकत, अशोक जायभाय, सुनिल शेलार, विनोद टाक आदींनी कर्जत – जामखेडमध्ये पवार कुटुंबातीलच उमेदवार देण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती.कर्जतचे कार्यकर्ते भेटीला गेल्यानंतर पवार यांनी अनेकदा आपला आमदार द्या, प्रश्न मार्गी लावू असे सांगितले होते. आता रोहित पवार मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. अजित पवारांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास त्यांच्या अनुभवाच्या जोरावर येथील अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.
आ.रोहित पवार यांचे मतदारसंघात उद्योग व्यवसाय आणून रोजगाराचा प्रश्न मिटवण्याचे ध्येय आहे. या भागात उद्योग व्यवसाय वाढीस लागण्यासाठी रोहित पवारांना अजित पवारांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे. प्रशासनावर वचक ठेवण्यात अजित पवार यांची महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. त्यामुळे कर्जतकरांकडून त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची प्रतीक्षा आहे.