मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अजूनही रखडलेला आहे. सध्याच्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती. पण नवरात्रीचा गुरुवारी पाचवा दिवस उजाडला तरी विस्ताराबाबत काही हालचाली नाही.
परंतू बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली. तर गुरुवारी सायंकाळी अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सत्ताधारी पक्षातीन अनेक नेत्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. अनेक नेत्यांना मंत्रिपदाची आशा आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळेल? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार हे राज्याचे अर्थ विभागाचे देखील मंत्री आहेत. दिल्लीला अर्थ विभागाची एक बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावेळी अजित पवार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलादेखील उपस्थित राहीले नव्हते.
त्याचदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांबाबतचा निर्णय झाला होता. अजित पवार यांच्यासाठी पुण्याचे पालकमंत्रीपद देण्याचेही या बैठकीत ठरले होते.