Ajay Kapoor । लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कानपूरच्या राजकारणातील मोठा चेहरा समजले जाणारे माजी आमदार अजय कपूर यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. कपूर यांनी पक्षाचा राजीमाना दिला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते आज पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे अजय कपूर यांची गणना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये होते. अशा स्थितीत त्यांनी काँग्रेस सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अजय कपूर यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधूनही काँग्रेस हे नाव हटवले आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि बिहारचे सहप्रभारी म्हणून काम केले.
काँग्रेसला कानपूरमध्ये बसणार मोठा फटका Ajay Kapoor ।
नुकतेच ते राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मध्ये सहभागी झाले होते. राहुल गांधी आणि प्रियांका यांच्या शेजारीच अजय कपूर बसले होते. अशा परिस्थितीत अजय कपूर भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसला कानपूरमध्ये मोठा फटका बसू शकतो.
अजय कपूर कानपूरमधून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसला त्यांना कानपूरमधून लोकसभा निवडणुकीत उभे करायचे होते. पण त्याआधीच कपूर यांनी पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला.
उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस १७ जागांवर तर समाजवादी पार्टी ६३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. सपाने आतापर्यंत 31 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, काँग्रेसने उत्तर प्रदेशातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही.
महाराष्ट्रातही काँग्रेसला धक्का Ajay Kapoor ।
दरम्यान, उत्तरप्रदेश नंतर इकडे काँग्रेसचे माजी मंत्री आणि आदिवासी नेते पद्माकर वळवी यांनी देखील पक्ष सोडला आहे. ते आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. पद्माकर वळवी हे नंदुरबारच्या शहादा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार आहेत. राज्याचे माजी क्रीडा मंत्री वळवी हे नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत.