नवी दिल्ली – एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे या विमान कंपनीची जगभरातील सेवा आज सुमारे सहा तास बंद राहिली होती. त्यामुळे जगभरातील विमानप्रवाशांचा मोठाच गोंधळ उडाला. या विमान कंपनीच्या संगणक सॉफ्टवेअर मध्ये ऍटलांटातील सीता कंपनीचा सॉफ्टवेअर आहे. तो अचानक बंद पडल्याने गोंधळ उडाला. पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हा प्रकार घडला. त्यामुळे बोर्डिंग पासेस प्रवाशानां देता आले नाहीत. त्यामुळे अर्थातच अनेक विमाने खोळंबून राहिली.
सहा तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व्हर सुरू करण्यात यश आले पण तेवढ्या अवधीत साऱ्या जगभरातील एअर इंडियाच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दिल्ली विमानतळावरील प्रवाशांना हा त्रास मोठा झाला. तेथून एअर इंडियाची अनेक विमाने उड्डाणासाठी सज्ज असतानाच हा प्रकार घडल्याने नेमके काय झाले आहे याचा अंदाज सुरवातीच्या तासभर कोणालाच आला नाही.
या प्रकाराबद्दल सीता कंपनीने प्रवाशांची दिलगीरी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की सॉफ्टवेअरच्या मेटेंनन्सच्यावेळी हा प्रकार घडला.पण आम्ही आता ही सारी सिस्टीम सुरळीत केली आहे. हा प्रकार नेमका कशाने झाला याची आम्ही तपासणी करीत असून पुन्हा असे प्रकार होणार नाही याचीही काळजी घेत आहोत असे त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.