– नंदिनी आत्मसिद्ध
आज आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन आहे. भारतानेही हवाई क्षेत्रात उज्ज्वल यश मिळविले आहे. भारताने घेतलेल्या हवाई भरारीचा थोडक्यात आढावा…
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील सात डिसेंबर रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन’ साजरा झाला. जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. अखिल विश्वातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात नागरी उड्डाणाचे महत्त्व काय आहे, याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. भारतात शहरीकरण वाढले असून, मध्यम तसेच उच्चवर्गीयांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानाने प्रवास करण्याच्या संख्येत सतत भर पडत आहे.
तीन महिन्यांपूर्वी मुंबई ते अहमदाबाद या आकाश एअरच्या पहिल्या विमान सेवेचे उद्घाटन झाले. पूर्वी विमानाने प्रवास करणे हे केवळ उच्चभ्रू लोकांना शक्य होते. आता पूर्वीच्या तुलनेत परवडणार्या दरात हवाई प्रवास करणे शक्य होऊ लागले आहे. ‘उडान’ योजनेअंतर्गत 425 हवाई मार्ग आहेत. ते लवकरच 1000 पर्यंत जातील. भारतात 68 नवीन विमानतळ उभारण्यात आले असून, लवकरच त्यांची संख्या 100 वर नेण्यात येणार आहे. येत्या चार वर्षांत नागरी हवाई वाहतूक सेवेमार्फत भारतात 40 कोटी लोक प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीसोबतच नागरी विमान वाहतूकही भारतातील वाहतुकीचा मोठा आधार बनणार आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गोव्यातील नागरी हवाई वाहतूक सेवा संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आशिया पॅसिफिक परिषदेला संबोधित केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, की भारतीय नागरी हवाई वाहतूक क्षेत्र आगामी सात ते दहा वर्षांत प्रचंड गतीने वाढणार आहे. भारतीय हवाई वाहतूक उद्योग कोविडपूर्व प्रवासी वाहतुकीच्या जवळपास 95 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री विजयकुमार सिंग यांनी तेथे दिली. गोव्यातील नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यामुळे गोव्यात पर्यटनाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली.
भारतीय लोक मोठ्या प्रमाणात जग पर्यटनाला बाहेर जातात. बड्या बड्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या जाहिराती आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहिला, तरी याची सहज कल्पना येते. हिवाळ्यात भारतात पर्यटनाला येणार्या प्रवाशांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर, चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ही प्रवासी संख्येच्या दृष्टीने कोविडपूर्व अवस्थेत पोहोचली असून, ही आनंदवार्ताच मानायला हवी. एप्रिल ते डिसेंबर 2023 या सहामाहीत भारतात हवाईमार्गे येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि भारतातून बाहेर देशांत जाणारे प्रवासी यांची संख्या तीन कोटी 14 लाख इतकी झाली. मागच्या वर्षात हा आकडा 3 कोटी 13 लाख इतका होता. 2022 पासूनच आंतरराष्ट्रीय प्रवासात सुदृढ वाढ होऊ लागली होती.
2022-23 मध्ये भारतात येणार्या व भारतातून बाहेर जाणार्या प्रवाशांची संख्या ही जवळपास अडीच कोटींपर्यंत पोहोचली होती. मात्र, 2020 मध्ये जी संख्या होती, त्या तुलनेत ही आकडेवारी 21 टक्क्यांनी कमीच होती. भारतात ये-जा करणारे प्रवासी मुख्यतः परदेशी विमान कंपन्यांच्या विमानातून प्रवास करतात. परंतु तरीही गेल्या चार वर्षांत देशी विमान कंपन्यांच्या बाजार हिश्श्यात नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा अर्थ त्यांची कामगिरी उपेक्षणीय म्हणता येणार नाही. अगोदर भारतीय विमान कंपन्यांचा बाजार हिस्सा 35 टक्के होता. तो आता 44 टक्क्यांपर्यंत झाला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण 3 कोटी 14 लाख प्रवाशांनी परदेशी प्रवास केला. त्यापैकी 1 कोटी 39 लाख व्यक्तींनी भारतीय हवाई कंपन्यांमार्फत प्रवास केला.
मुख्यतः इंडिगो आणि विस्तारा या खासगी कंपन्यांचा दबदबा या काळात वाढला आहे. एअर इंडिया ही पूर्वी सरकारी कंपनी होती. आता ती टाटा समूहाचा एक भाग बनली आहे. तिनेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उलट स्पाइस जेटसारखी कंपनी अडचणीत असून, तिचा बाजारहिस्सा घटला आहे. वाडिया समूहाच्या मालकीची गोफर्स्ट ही कंपनी असून, तिचा व्यवसाय कमी झाला आहे. मे महिन्यापासून तर तिने आपला व्यवसाय स्थगित केला आहे. एअर इंडिया एक्सप्रेस या एअर इंडियाच्या कंपनीतला बाजारपेठेतील वाटा घटला आहे. इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाने आपले नेटवर्क विस्तारले असून, क्षमतादेखील वाढवली आहे. काही विदेशी कंपन्यांच्या वाहतूक क्षमतेतही थोडीबहुत वाढ झाली आहे.
तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे काही नॉर्थ अमेरिकन कंपन्यांनी आपल्या विमानांच्या उड्डाणांमध्ये घट केली आहे. त्याचा फायदा भारतासारख्या देशांना होत आहे. इंडिगोचा बाजारपेठेतील वाटा एक वर्षापूर्वी 15.7 टक्के होता. तो आता 17.8 टक्के झाला आहे. चार वर्षांपूर्वी तर तो फक्त दहा टक्के इतका होता. विस्ताराचा बाजारहिस्सा 0.1 टक्के होता. तो आता 3.2 टक्के इतका झाला आहे. एअर इंडियाचा वाटा 12.2 टक्क्यांवरून 12.6 टक्के इतका झाला आहे. एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि विस्तारा या तिन्ही कंपन्या टाटा समूहातील असून, एकूण आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी 23 टक्के प्रवासी या कंपन्यांच्या विमानांमधून प्रवास करतात. इंडिगोपेक्षा त्यांचा वाटा जास्त आहे. स्पाइस जेटचा बाजारपेठेतील वाटा 3.6 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर आला आहे. अर्थातच कार्यक्षमता, विश्वासार्हता, प्रवाशांना मिळणार्या सुविधा, त्यांची गुणवत्ता अशा घटकांवर कोणती हवाई वाहतूक कंपनी लोकप्रिय ठरते, हे निश्चित होत असते. एकुणात भारताचा हवाई वाहतूक उद्योग भरभराटीस आला आहे, हे नक्की.