औरंगाबाद – राज्य सरकार सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहे. या निर्णयानंतर राज्यभरातून अनेक राजकीय नेत्यांसह नागरिकांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अशातच आता ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी किराणा दुकान आणि सुपर शॉपीत वाईन विक्रीला परवानगी दिल्याच्या निर्णयावर थेट ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सत्ताधारी सर्व पक्षांनी हिंमत असेल, तर औरंगाबादमध्ये किराणा दुकान किंवा सुपर शॉपीत वाईन शॉप उघडून दाखवावे. जर औरंगाबादमध्ये किराणा दुकान आणि सुपर शॉपीत वाईन विक्री सुरू झाली तर ते दुकान फोडण्याची जबाबदारी माझी असेल, असा इशारा त्यांनी औरंगाबादमध्ये बोलताना दिला.
इम्तियाज जलील म्हणाले, “अजित पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मी आव्हान देतो. तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादमध्ये कोणत्याही किराणा दुकान किंवा सुपर शॉपीत वाईन शॉप उघडून दाखवा. किराणा दुकानात एक जरी वाईन शॉप सुरू झालं तर मी स्वतः आणि माझे कार्यकर्ते ते फोडतील. इतकंच नाही तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला आणि माझ्या आया-बहिणींनी जिथं किराणा दुकानात वाईन दिसेल ते दुकान फोडा.”
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही एक पत्रक काढून वाईन विक्रीचा विरोध केला आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. दारू विक्रीचा हा निर्णय राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. तसेच संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते, असेही अण्णा म्हणाले.