राहुरी – सज्जनांचे संरक्षण करणे हाच खरा वारकरी धर्म आहे. कंटकाचे निर्दालन करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित जागरूक राहण्याची गरज आहे. गुहा येथील घटनेच्या प्रकरणात राज्यातील वारकरी संघटना त्यांच्यामागे खंबीरपणे उभी आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे राज्य सरकारने त्वरीत हटवावे. तसे न झाल्यास सविनय कायदेभंगाची चळवळ हाती घ्यावी लागेल, असा इशारा महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी दिला.
गुहा येथील कानिफनाथ मंदिरात भक्त, पुजारी यांना मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित निषेध मोर्चाचे तहसील कचेरीसमोर जाहीर सभेत रुपांतर झाले.
महंत मंडलिक म्हणाले, आता वारकरी संप्रदायाने प्रसंगी कायदा मोडण्याची तयारी करावी लागेल. गुहा येथील कानिफनाथ ट्रस्टची जमीन हडपण्याचे कारस्थान आपण हाणून पाडू. येथील जमिनीवरील अतिक्रमणे न हटविल्यास सविनय कायदेभंग चळवळीतून ती हटवू. वारकऱ्यांना मारहाण करण्यासाठी चिथावणी देणाऱ्यांना गुन्हेगार बनवा. आमच्या मंदिरात ते घुसतातच कसे, असा सवाल केला. आता असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशार दिला.
कानिफनाथ मंदिराचा मूळ उतारा महाराष्ट्र शासनाचा आहे. तेथे शेकडो वर्षांपासून सप्ताह, आरती, भजन चालते आहे. आळंदी व पंढरपूर कार्तिकी वारीत हे प्रश्न समोर ठेवू. गुहा ग्रामस्थांबरोबर आम्ही आहोत. एकत्र येवून लाखोंच्या संख्येने मोर्चा काढू. केवळ निषेध करून चालणार नाही. अतिक्रमणे हटवा, अन्यथा कायदा मोडू, असा इशारा दिला.
अजय मांजरे म्हणाले, गुहा येथील मंदिर कानिफनाथाचेच आहे. चाळीस एकर जमीन आहे. ती बळकावण्यासाठी ट्रस्ट केला. आमचा त्यास विरोध आहे. रंगपंचमीला हिंदू पद्धतीने वार्षिकोत्सव होतो आहे. गावात अशांतता निर्माण करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी.
महंत अर्जुन महाराज तनपुरे म्हणाले, वारकऱ्यांनी एकत्र आलेच पाहिजे.आपण सक्षम राहिलेच पाहिजे. ह.भ.प.किशोर महाराज जाधव म्हणाले, आमच्यावर हल्ला करून आम्हाला डिवचले आहे. आमच्या नादी लागू नका. नाठाळाच्या माथी काठी हाणू. आमच्या नादाला लागू नका, असा इशारा दिला. ह.भ.प गोसावी, ह.भ.प.पांडुरंग महाराज यांनीही संताप व्यक्त केला. प्रा.एस. झेड.देशमुख म्हणाले, वारकरी आता जागे झालेत. पुढे यादवी होणार आहे. आपण सजग राहिले पाहिजे.
यावेळी नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी वारकरी संप्रदायाचे वतीने निवेदन स्वीकारले. किरण कोळसे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील व विविध संघटनेचे प्रतिनिधी हजर होते. वायएमसीए मैदानापासून मोर्चा सुरू झाला. चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात होता.