शेवगाव – तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात काल (बुधवार) रात्री अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. यंदाच्या ऐन पावसाळ्यातच पावसाअभावी अगोदरच दुष्काळी परिस्थितीच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना गेल्या तीन-चार दिवसात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणखी बेजार केले.
शेवगावच्या सर्वच्या सर्व सहा मंडलांत रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसह खरिपाच्याही विविध पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. तालुक्यातील भातकुडगाव मंडलात तर अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तूर, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या, तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला. काढणीला आलेल कापूस, तूर, कांदा, टोमॅटो, डाळिंब, लिंबू, केळी आदी पिकांचे नुकसान झाले.
रविवारी व बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आ. मोनिका राजळे यांनी प्रशासनास दिल्या. त्यानुसार कामगार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिले आहेत. आज (गुरुवार)अखेर तीन दिवसांत मंडलनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे ः चापडगाव ६४ मिलिमीटर, एरंडगाव ५६, बोधेगाव ६४, शेवगाव ४७, ढोरजळगाव ३७. भातकुडगाव मंडलत रविवारी ७६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरची आकडेवारी उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.