तालुका गुटखा टीमच्या कॅप्टनपदी आफ्रिदी
प्रशासनाचे दुर्लक्ष; छोट्या दुकानदारांवर कारवाई, बडे मासे मोकाट
अमोल मतकर
संगमनेर – राज्यात तंबाखूजन्य पदार्थ, तसेच गुटखाबंदी असूनही तालुक्यासह जिल्ह्यात राजरोसपणे खुलेआम विक्री सुरू आहे. नेहमीच छोट्या-छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाते. मात्र, बडे बोके नेहमीच बाहेर राहतात. तालुक्यातील गुटखा टीमचे कप्तानपद काही वर्षे अगोदर पाटील यांच्याकडे होते. मात्र, आता कप्तानपदी आफ्रिदी याची निवड झाल्याने प्रशासनाच्या नेहमी संपर्कात राहून त्याने परिसरात चांगलाच जम बसवला आहे.
सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी सरकारने गुटखाबंदी केली. मात्र, या बंदीचा फायदा होण्याऐवजी प्रशासकीय अधिकार्यांचीच पोळी भाजली जात आहे. प्रशासनाच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे शहरात खुलेआम जादा पैसे देऊन सर्वत्र गुटखा विक्री सुरू आहे. याचाच अर्थ गुटखाबंदीमुळे उत्पादक, पुरवठादार, विक्रेते यांचाच फायदा झाला आहे. राज्यात बंदी असलेला; पण परराज्यात उत्पादित होणारा गुटखा, सुगंधी तंबाखू आदी पदार्थ पोलिस पकडतात, तरीही शहरासह जिल्ह्यातील पानटपऱ्यांवर हाच गुटखा अगदी सहजतेने उपलब्ध होतो. पोलिसांच्या हाती लागणारा गुटखा सापडतो. तो विकणाऱ्यांवर कारवाईही होते, मात्र तरीही त्याची विक्री थांबत नाही, असेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे. राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीस बंदी घालण्यात आली असली, तरी दुर्दैवाने इतर राज्यांत गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने तेथून तस्करी करून हा माल अर्थपूर्ण संबंधाने राज्यात येतो.
बऱ्याच प्रकरणांमध्ये हा साठा बंदी नसलेल्या राज्यात चालला होता, असे स्पष्टीकरण देण्यात येते. मात्र, तपासाअंती गुटख्याचे स्थानिक कनेक्शनही समोर येते. स्थानिक गुटखा व्यापाऱ्यांवर कारवाई झालीच, तर संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांशी अर्थपूर्ण हातमिळवणी करून करून मुख्य सूत्रधार मोकाट सोडला जातो. तोही जामिनावर सुटल्यानंतर अगोदरपेक्षा जोरात आणि जोमाने धंदा करतो .
तालुक्यात जोमाने काम करत असलेल्या गुटखातस्कराने प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपले काम साध्य करून घेतले आहे. त्यामुळे आता तालुक्याच्या कप्तानपदीच आफ्रिदी बसल्याने प्रशासनानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तसेही अन्न व औषध प्रशासनाने तर या सगळीकडे डोळझाकच केल्याने त्यांना जिल्ह्यातील गुटखा दिसतच नाही आणि दिसला तरी छोटे-छोटे टपरीधारकांवर कारवाई करतात. त्यामुळे त्यांनी बडे मासे शोधावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जनता करत आहे.