श्रीगोंदा -अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत श्रीगोंद्यात सकल मराठा समाजातर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. येथील तहसील कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या वेळी संतोष इथापे, अरविंद कापसे, आरती रणसिंग, नवनाथ खामकर, राजेंद्र नागवडे, मारुती भापकर, मनोहर पोटे, बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे, स्मितल वाबळे आदींची भाषणे झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी दलित समाजातर्फे उपोषणाला भेट देत पाठिंबा दिला. शाहीर नानासाहेब साळुंके यांनी शाहिरीमधून मराठा आरक्षणाची गरज व महत्त्व पटवून दिले. रेणुकामाता भजनी मंडळाने भजनसेवा केली.
मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार हेमंत ढोकले यांना देण्यात आले. या वेळी भारती इंगावले, माया खेंडके, मीरा शिंदे, भोजराज मोटे, अक्षय अनभुले, हरी मचाले, सागर जंगले, संतोष मांडे, शुभम रोडे, प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.
राजकीय नेत्यांना गावबंदी
जामखेड -मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,तोपर्यंत खासदार, आमदारसह, राजकीय पुढाऱ्यांना जामखेड तालुक्यातील जामखेड शहरसह खर्डा, अरणगाव यासह 34 गावात गावबंदी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी तसे फलक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लावण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत संपूर्ण जामखेड तालुक्यात गावबंदी होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा तर नाहीच, उलट त्यांच्या विरोधात चुकीचे विधान केले जात आहे. त्यामुळे गावातील सर्व समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून कोणत्याच नेत्याला आम्ही गावात येऊ देणार नाही, असा एकमुखी निर्णय मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील जामखेड शहर, खर्डा, अरणगाव, रत्नापुर, पाटोदा, धोत्री, जामदारवाडी, पाडळी कुसडगाव, भोगलवाडी, घोडेगाव, पिंपळगाव उंडा, पिंपळगाव आळवा, नान्नज, बोरला, सोनेगाव, सातेफळ, मुंगेवाडी, दौंडवाडी, वंजारवाडी, आपटी, तरडगाव, पोतेवाडी, जातेगाव, नायगाव, नाहुली, चोभेवाडी, तेलंगशी, भुतवडा, खुरदैठण, धनेगाव, वाकी, लोणी या गावात गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आह,े अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिली आहे.
संभाजीनगर रस्त्यावर रास्ता रोको
सोनई -नगर – संभाजीनगर महामार्गावर कांगोणी फाटा येथे सकल मराठा समातातर्फे आज दुपारी रास्ता रोको करण्यात आला होता. दुपारी 12.30 वाजता शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कांगोणी फाटा या ठिकाणी मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मागणीच्या अनुषंगाने रास्ता रोको करण्यात आला होता.
अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रास्तारोको वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सकल मराठा समाजातर्फे देण्यात येणारे निवेदन वडाळा मंडळ अधिकारी फिरोज सय्यद व शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी स्विकारले. रास्ता रोको दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडु नये व शांततेत पार पडण्यासाठी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता. रास्ता रोको संपल्यावर अवघ्या काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.
संगमनेरात साखळी उपोषण
संगमनेर -मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी ज्वलंत केल्यानंतर संगमनेरचा सकल मराठा समाज एकवटला असून जरांगे पाटीलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर बसस्थानक परिसरात दत्त मंदिरासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
बुधवारपासून शहरातील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातील दत्त मंदिराजवळ मंडप उभारून सकल मराठा समाजाच्या बांधवांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. आंतरवली सराटीत मराठा योद्धा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी आम्ही उपोषणास बसलो आहोत.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तडीस लावण्याच्या न्याय मागणीसाठी हे आंदोलन सुरु राहणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. यावेळी सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.
भातकुडगाव फाटा चौफुल्यावर साखळी उपोषण
शेवगाव -येथील नेवासे राजमार्गावरील भातकुडगाव फाट्यावर कामधेनू पतसंस्थेच्या प्रांगणात सकल मराठा समाजातर्फे संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी श्री क्षेत्र भावीनिमगाव येथील जगदंबा मातेच्या चरणी श्रीफळ वाढवून व छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून येथे नियोजित ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणामध्ये अशोक देवढे, सरपंच राजेंद्र आढाव, शंकरराव नारळकर, “प्रहार’चे तालुकाध्यक्ष रामभाऊ शिदोरे, तुकाराम शिंगटे, कामधेनू पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काळे उपस्थित आहेत. शिवशाहीर कल्याण काळे, राजेंद्र फटांगरे, विठ्ठलराव फटांगरे, हमीद सय्यद, सरपंच राहुल बेडके, सरपंच आबासाहेब काळे, गणेश खंबरे, विठ्ठल फटांगरे, देवदान वाघमारे, गणेश शिंदे, रवींद्र खरड, शिवाजी उभेदळ, डॉ.महेश दुकळे, उस्मानभाई सय्यद आदींनी पाठिंबा दिला आहे.
परिसरातील गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी करून तशा आशयाचे फलक गावाच्या प्रवेशद्वारावरच लावून सरकारचा तीव्र निषेध केला आहे. साखळी उपोषणास लेखी पत्र देऊन पाठिंबा दर्शविला आहे.
सर्वपक्षियांना गावात “नो एंट्री’
खेड -जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांना शिंपोरे, बाभूळगाव दुमाला, मानेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश नाही, तसेच सर्व निवडणुकीच्या मतदानावर ग्रामस्थांचा बहिष्कार असल्याचा ठराव येथील ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला आहे. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रुप ग्रामपंचायत शिंपोरा अंतर्गत मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिंपोरा ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या गावात मराठा समाजाची अनेक कुटुंबे आहेत. या कुटुंबांची आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. त्यामुळे मुलांना शिक्षणात आणि नोकरीत अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे गावातीलच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळाले, तर भविष्यात मुलांचे शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न सुकर होईल.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आवाज उठवणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिंपोरा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत सर्व गावात एकाही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेते, पुढारी, आमदार, खासदार आदींना गावात प्रवेशबंदी असल्याचे घेण्यात आलेल्या ठरावत म्हटले आहे. जमलेल्या ग्रामस्थांनी आरक्षण मिळावे यासाठी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. या वेळी नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
आरक्षणाबाबत सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा आता संपणारा नाही. मराठा समाजाला कुणीही हलक्यात घेऊ नये. मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय झाला नाही तर आता हा लढा अधिक तीव्र होणार आहे. सर्व राजकीय नेत्यांनी आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस राहुल भोसले यांनी सांगितले.