शिर्डी -साई संस्थान जनसंपर्क कार्यालयातून वितरित होणारे आरती व दर्शन पेडपास यावर मोठे निर्बंध आणले असून, या प्रकरणी दैनिक प्रभातने याबाबत प्रथम आवाज उठवल्याने भाविकांकडून दै. प्रभातवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दै. प्रभातच्या संस्थानच्या देणगी कार्यालयातील भ्रष्टाचार व आरती पासेसच्या काळ्याबाजाराचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने राज्यभर एकचं खळबळ उडाली होती. साई संस्थान प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत संस्थान जनसंपर्क कार्यालयातर्फे वितरित होणारे आरती व दर्शन पेडपास यावर मोठे निर्बंध आणण्यात आले असून, यापूर्वी खिरापतीसारखे याचे वितरण होऊन अनेकांनी याच पासेसच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमविला आहे.
यात शिर्डीतील एका माजी नगरसेवकाचे नावसुद्धा उघड झाले होते. साई संस्थानने आता लाखो रुपये खर्च करून विशिष्ठ सॉफ्टवेअर बसविले असून, यामध्ये शिफारस करणारा याचे संपूर्ण रेकॉर्ड, भाविकांचे फोन नंबर, पत्ता, आधार कार्ड याची सर्व माहिती पास वितरित करण्यावेळी सक्तीची व अनिवार्य केली आहे. त्यामुळे आता कोणीही कुणाच्या नावावर पास घेऊन प्रवेश करू शकत नाही. कारण याची सर्व तपासणी सुरक्षा अधिकारी काटेकोरपणे करत असून, दर्शनाच्या नावाखाली काळाबाजार करणाऱ्या एजंटच्या अनेक टोळ्यांवर कायमचाच पायबंद बसला आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही भाविकाला सेम डे अर्थात त्याच दिवशी पास मिळू शकत नाही. त्यासाठी एक किंवा दोन दिवस ऑनलाइनद्वारे आपली सर्व माहिती देऊनच पास बुकिंग करावी लागेल. त्यामुळे आता कुणाच्याही नावावर सायबर कॅफेमधून ऐनवेळी पास मिळणार नाही. यासर्व नियमावलीमुळे आता सर्वसामान्य भाविक जो तासन्तास दर्शन रांगेत ताटकळत उभा असायचा आता त्यालाही आरतीचा लाभ थेट गाभाऱ्यात उभे राहून मिळू लागला आहे.
अर्थात अनेक वर्षांच्या या आनंददायी क्षणाचा लाभ घेणाऱ्या अनेक भाविकांनी संस्थान प्रशासनाबरोबरच दै. प्रभातला धन्यवाद दिले आहेत. यापुढील काळात जनसंपर्क कार्यालयात अनेक महत्त्वाचे फेरबदल होणार असून, त्यात खास करून मनुष्यबळ व पास वितरणाचे काउंटर वाढविले जाणार असून, पास घेऊन लगेचच प्रवेश देण्याची सुविधा सुरू होणार आहे. कोणताही पास बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. एरवी चारही गेटवर एजंटांचा सुळसुळाट होता. पासेसचा काळाबाजार त्यांच्यामार्फत शिफारशींच्या आधारे होऊन अनेक भाविकांची लूट व फसवणूक होत होती. मात्र, आता ती यापुढे होणार नाही यासाठीच संस्थान प्रशासनाने जोर दिला असून, जनसंपर्क कार्यालयातील कारभार पारदर्शक होण्यासाठी आणखी फेरबदल होणार आहे.
एजंट झाले परागंदा!
एरवी चारही गेटवर एजंटांचा सुळसुळाट होता. पासेसचा काळाबाजार त्यांच्यामार्फत शिफारशींच्या आधारे होऊन अनेक भाविकांची लूट व फसवणूक होत होती. आता कडक नियमावलीमुळे पास वितरणावर 90 टक्के फरक पडला असून, काळ्याबाजारावर मोठा पायबंद बसला आहे. अनेक एजंट आता परागंदा झाले आहे.
10 महिन्यांत 36 हजार पास!
शिर्डीतून दहा महिन्यांत शिफारसदारांच्या माध्यमातून तब्बल 36 हजार पास वितरित केल्याची माहिती उच्च न्यायालयात सादर केली असून, यावरून अंदाज येतो की इतके पाहुणे व मित्र इतक्या मोठ्या संख्येने खरंच येत होते का?