पाणीयोजनेची यशस्वी चाचणी, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
शेवगाव – अखेर ताजनापूर उपसा जलसिंचन योजना टप्पा क्रमांक दोनचे पाणी वितरण कुंडात पोहोचले. शेवगाव तालुक्यातील वीस गावांसाठी संजीवनी ठरणारी ताजनापूर टप्पा दोन ही योजना अंतिम टप्प्यात असून योजनेच्या पाचपैकी दोन वितरण कुंडात पाणी पोहोचून त्याची यशस्वी चाचणी शुक्रवारी (दि १५) घेण्यात आली.
उर्वरित वितरण कुंडांतून पाण्याची चाचणी घेण्यासाठी ताजनापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपकार्यकारी अभियंता श्रीहरी कुलकर्णी व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्न करत आहेत. २०१४ सालापासून या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना ताजनापूर उपसा सिंचन योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध केला. आतापर्यंत या योजनेसाठी सुमारे १२० कोटी खर्च करण्यात आला. योजनेच्या मुख्य पंपग्रह पोहच कालवा उर्दूगामी नलिका, वितरण कुंड यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती देऊन योजनेच्या वितरण कुंडापुढील पाईप वितरण व्यवस्थेचे काम जून २०२४ अखेर पूर्ण करण्याची ग्वाही आ.मोनिका राजळे यांनी दिली .
जायकवाडी जलाशयातून ताजनापूर उपसा सिंचन योजनेसाठी ३८७८ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले. पैकी १६११दलघफू पाणी टप्पा क्रमांक एकसाठी तर उर्वरित २२६७ दलघफू पाणी टप्पा दोनसाठी उपलब्ध आहे. यामध्ये वीस गावांतील ६९६० हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचा लाभ होणार आहे. योजनेच्या एमआर २, एम आर ३ च्या पंपाची यशस्वी चाचणी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहितीही आ.राजळे यांनी दिली.