शेवगाव -अंतरवली सराटा येथे मराठा भूषण मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांना चोहो बाजूने सर्वस्तरावर पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तालुका पेटून उठला आहे. शेवगाव तालुक्यातील 113 गावांपैकी बहुतेक सर्वच गावांनी फलक लावून पुढाऱ्यांना गाव प्रवेशाची बंदी केली आहे. टप्याटप्याने गावे कडकडीत बंद पाळत आहेत. पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देत आहेत. गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहेत. साखळी उपोषणासाठी नागरिकांची स्पर्धा लागली आहे.
विविध जाती धर्म व पक्षीय गटतट बाजूला ठेवून लोक उपोषणस्थळी येऊन मराठा आरक्षणास पाठिंबा देत आहेत. तालुक्यातील शिक्षण संस्थांनी देखील मुख्यमंत्र्यांना हा तिढा सोडविण्याचे आवाहन करून एक दिवस आपल्या संस्थेची विद्यालये बंद ठेवून लाक्षणिक बंद पाळत आहेत. अशा पद्धतीने तालुक्यातून चोहो बाजूने व विविध स्तरातून तालुका मराठा आरक्षणासाठी पेटला आहे. तालुक्यातील गावांच्या प्रवेशद्वारी तसेच प्रमुख रस्त्यावर पुढाऱ्यांना प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले असून ‘आता नाही तर कधीच नाहीं’, “चुलीत गेला पक्ष आता एकच लक्ष’ असे भावनिक घोष लिहून एकीचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
शेवगाव, ढोरजळगावख भातकुडगाव फाटा, लखमापुरी अशा एक ना अनेक गावात साखळी उपोषण सुरू असून राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आज शेवगाव येथे उपोषण स्थळी येऊन उपस्थिती लावली. येथील सकल वडार समाजाने, धनगर समाजाने तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी ही अनेक ठिकाणी उपोषणकर्त्यांना भेट देऊन सकल मराठा समाजाच्या रास्त मागणीला पाठिंबा दिला आहे.
आमदार मोनिकाताई राजळे यांनी ही सकल मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांच्यामागे आम्ही उभे आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतल्याचे जाहीर केले आहे.
दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी तसेच शेवगावच्या एफडीएल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. शिवाजी काकडे यांनी देखील आपल्या शिक्षण संस्थेची विद्यालये आज बंद ठेवली आहेत.
आज रांझणी गावानेही कडकडीत बंद पाळला. तालुक्यातील सालवडगावचे सरपंच अण्णासाहेब रुईकर व उपसरपंच यमुनाबाई काकासाहेब भापकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमचा भाऊ मनोज जरांगे पाटील जीवन मरणाची लढाई लढत असताना आम्ही या पदावर राहणे संयुक्तिक वाटत नाही म्हणून आज पदाचे राजीनामे दिले आहेत. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या शेकडो सदस्यांनी या अगोदर आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.