नगर -जिल्हा विभाजनासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यालय आताच शिर्डीत उभारण्यात आली आहेत. त्यामुळे यातून लवकरच नगर जिल्ह्याचे विभाजन होऊन शिर्डी हे जिल्ह्याचे मुख्यालय असणार हे आता स्पष्ट झाले आहे. आता केवळ जिल्हा विभाजनाचा महूर्त ठरणे बाकी असल्याचे मत भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर, प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, सुरेंद्र गांधी, अनिल मोहिते आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. प्रा. शिंदे म्हणाले की, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी कोणतेही वाद नाहीत. मला जे पटते ती मी मांडतो. बहुसंख्य नेत्यांचे दौरे, कार्यक्रम शिर्डीत होत आहेत. दक्षिण भागात कार्यक्रम होत नाहीत. ही कार्यकर्ते, नागरिकांची भावना आहे. ढवळपुरी येथे मंजूर झालेले मेष महामंडळाचे कार्यालय हे राज्याचे मुख्यालय आहे. परंतु ढवळपुरी हे ठिकाण गैरसोयीचे आहे. त्यामुळे ते तिथून स्थलांतरित होणे आवश्यक आहे, त्याबद्दल माझे दुमत नाही अशीही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
संघटनेची जबाबदारी आमच्यावरः आगरकर
खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले. त्या संदर्भात बोलतांना शहर जिल्हाध्यक्ष आगरकर म्हणाले, खासदार विखे विकासाचे चांगले काम करतात. त्यांनी विकास कामांकडे लक्ष द्यावे.संघटनेची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. ती आम्ही पार पाडू. असे ऍड. आगरकर म्हणाले.