नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबरला शिर्डीत येणार आहे. त्या पार्श्वभूमिवर भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत मोदींसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात येत असून स्वतः डॉ. विखे तालुकानिहाय दौरे करून गर्दीचा उच्चांक करण्याच्या तयारी आहेत. प्रशासनासह पक्षपातळीवर बैठका घेण्यात येत आहे. या दिवशी शाळांना सुट्टी देण्याची मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीला आले होते. त्यानंतर आता पुन्हा 26 ऑक्टोबरला त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे.केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही होणार आहे. यासाठी किमान एक ते दीड लाख लोकांची गर्दी जमविण्याचे नियोजन आहे. सुमारे 30हजार लाभार्थ्यांनाही शिर्डीत आणले जाणार आहे.
लोकांच्या येण्या-जाण्यासाठी गावनिहाय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एसटीच्या बसची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र एसटी बसेस या कार्यक्रमाला आणल्यास प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा यापूर्वीचा अनुभव असल्यानेच 26 ऑक्टोबरला शाळांना सुट्टी द्यावी, त्याऐवजी एखाद्या रविवारी शाळा भरवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. शाळा बंद ठेवल्यास शाळांसाठी वापरण्यात येणाऱ्या बस कार्यक्रमासाठी वापरता येतात. तसेच शाळेत जाण्यासाठी एसटी बस मिळाली नाही, अशी तक्रारीही येणार नाहीत.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात शाळांना सुट्टी द्यावी, असा प्रस्ताव पालकमंत्री विखे पाटील यांनी पक्षाच्या बैठकीत ठेवला. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही ही मागणी उचलून धरली. पालकमंत्री विखे पाटील यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी भाजप, शिंदे गट व अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेत कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वय राखत नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.