कोपरगाव – जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत असताना बकेटमधून पडून गंभीर जखमी झालेल्या गोकुळ कदम यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील रात्री 10 वाजता थेट कोपरगावात आले. त्यांनी येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज रुग्णालयात कदम यांच्या तब्यतेची विचारपूस करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर चर्चा केली. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची चौकशी करीत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात दि. 9 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली होती. जरांगे पाटील यांचे येवल्यात आगमन होताच त्यांच्या स्वागत मिरवणुकीत जेसीबीच्या बकटेमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. त्याचवेळी जेसीबीतून फुलांची उधळण करत असताना लोडर पलटी होऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले होते. त्यापैकी गोकुळ रावसाहेब कदम (रा. नेवरगाव ता. येवला जि. नाशिक) यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर कोपरगाव येथील एस.जे. एस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री 10 च्या सुमारास जरांगे यांनी जखमी गोकुळ कदम आणि त्यांच्या नातेवाइकांची भेट घऊन त्यांना धीर दिला. मनोज जरांगे रुग्णालयाच्या बाहेर पडताच तरुणांनी त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच “एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. यावेळी रुग्णाची काळजी घेण्याची विनंती मनोज जरांगे यांनी डॉक्टरांना केली. याप्रसंगी काही तरुणांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वतीने रोख स्वरुपाची मदत जखमीच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली असल्याचे सांगितले.
जरांगे पाटील म्हणाले की, माणुसकीच्या नात्याने जर या समाजबांधवाला मदत करण्यात येत असेल तर ठीक आहे मात्र राजकारण म्हणून जर कोणी मदत करत असेल तर मदत न केलेली बरी. समाज बांधव मदतीसाठी सक्षम असल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांच्या कोपरगाव भेटीने मराठी बांधवांमध्ये त्यांच्या प्रति अधिक सहानुभूती वाढली आहे.