बोधेगाव-ऊस दरासाठी सगळीकडे आंदोलने, रस्तारोको सुरू असताना संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांना टनामागे 2700 रुपयांचा दर दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्व.बबनराव ढाकणे यांनी शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात बोधेगाव येथील उजाड माळरानावर केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती केली. या कारखान्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार आणि बागायदार यांना न्याय मिळाला. कारखान्याच्या कार्यकालात अनेक अडचणींना सामोरे जात व्यवस्थापनाला संघर्ष करावा लागला. विक्रीस निघालेला कारखाना, केदारेश्वरचे माजी चेअरमन ऍड. प्रताप ढाकणे यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे सहकार्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांच्या योग्य नियोजनामुळे तो सुस्थितित आणला.
आज कारखान्याकडे डिस्टलरी इथेनॉल को जनरेशन असे जोड उद्योगधंदे नसतानाही केदारेश्वरचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांचे नियोजन आणि उपाध्यक्ष माधव काटे यांच्या सोबतीने कारखान्याने केंद्र सरकारच्या एफआरपीप्रमाणे एका टनाला 2700 रुपयाचा दर जाहीर करून तो शेतकऱ्याच्या खात्यावर वर्गही केला. परिसरात मातब्बर सहकारी साखर कारखाने असतानाही केदारेश्वरने उचलेल्या पावलामुळे एकूणच ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
केंद्र सरकारच्या सव्वा दहा टक्के रिकव्हरीप्रमाणे 3150 रुपयाचा टनामागील दर वाहतूक तोडणीसह देण्यात यावा, या केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे केदारेश्वरने वाहतूक तोडणी 721 वजा करता 2429 रुपये देय असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रती टन 2700 रुपयाप्रमाणे पेमेंट जमा केले आहेत
तीर्थराज घुंगरट, चीफ अकाउंट
स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून ढाकणे कुटुंबीयांनी कारखान्याला अडचणीतून बाहेर काढले. साखरे व्यतिरिक्त या कारखान्याला कोणत्याही उपपदार्थाची जोड नसताना देखील शेतकरी,परिसरातील सर्वांगीण विकास आणि चालूवर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना हातभार लागावा, या उद्देशाने केदारेश्वर कारखान्याने 2700 रुपयाचा दर जाहीर करून रक्कम खात्यावर वर्ग केली आहे.
ऍड. प्रताप ढाकणे, माजी अध्यक्ष, केदारेश्वर कारखाना