संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या. त्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे कॉंग्रेसकडून निलंबन करण्यात आले होते. उमेदवारी देऊनही डॉ. तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे डॉ. तांबे यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली. डॉ.तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. परंतु आता गुरुवारी (दि.12) सकाळपासून दिल्लीत महाराष्ट्राचे दोन दिग्गज नेत्यांची बैठक झाली असून तांबे यांना कॉंग्रेसमध्ये परत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवारी डॉ. सुधीर तांबे यांना देण्यात आली होती. पंरतु, त्यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला नाही.उलट त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्याविरोधात कारवाई करत निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या डॉ. तांबेंना पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिल्यानंतरही डॉ. तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांना अपक्ष निवडून आणले. यामुळे डॉ. तांबेंवर 15 जानेवारीला तारिक अन्वर यांनी कारवाई केली होती. मात्र, आता अहमदनगर व उत्तर महाराष्ट्रातून पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी दोन महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बोलणी सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्षांकडून कोणत्याही ग्रीन सिग्नल न आल्याने संबंधित नेत्यांची दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे डॉ. तांबेंवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार का? पुन्हा एकदा त्यांना पक्षात स्थान दिले जाणार का? किंवा त्यांना दुसरी कोणती जबाबदारी देण्यात येणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.