नेवासा – नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे श्री दत्तजयंती महोत्सवास बुधवार दि.२० डिसेंबरपासून संत – महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला. यावेळी कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी गायलेल्या शिव तांडव स्त्रोताने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नामाच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली होती.
श्री दत्तजयंती महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगीच भारताच्या कानाकोपऱ्यातील मठामधील संत-महंतांचे आगमन देवगड नगरीत झाले. त्यांचे महंत भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी दर्शन घेत स्वागत केले. हरियाणा येथील कालिदास मठाचे महंत श्री श्री श्री १००८ परमहंस कृष्णानंद कालीदासबाबा, कर्नाटक येथील शंकराचार्य अभिनव विद्या नृसिंह भारती महाराज, विदर्भातील रामानंदाचार्य राम राजेश्वराचार्य माऊली सरकार, द्वारकापीठ येथील सुर्याचार्य कृष्णदेवनंद गिरी महाराज, कालीपुत्र श्री कालीचरण महाराज ,त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी ऋषिनाथ महाराज या संत- महंतांचा देवगड भेटीत समावेश होता.
“श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव”, असा जयघोष यावेळी केला. या सर्व संत-महंतांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वर,कार्तिक स्वामी, श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी गुरुवर्य उपस्थित संत महंतांचे वस्त्र देऊन व पुष्पहार घालून संतपूजन करण्यात आले. सेवेकरी बजरंग विधाते यांनी देवगड क्षेत्र स्थानमहिमा याबद्दल उपस्थित संत-महंतांना माहिती दिली. सर्वांनी देवगड येथील ज्ञानसागर सभामंडपामध्ये श्री दत्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास भेट दिली. “हर हर महादेव”जय श्रीराम”असा जयघोष यावेळी भाविकांनी केला.
पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रयांसह संत किसनगिरी बाबांच्या मूर्तीस महंत भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्याहस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सदगुरू किसनगिरी बाबांच्या प्रतिमेसह ग्रंथ पूजन व वीणा पूजन करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. दत्तजयंती निमित्त देवगड मंदिर परिसरातील सर्व तयारी पूर्ण झाली असून, भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.