नगर – सार्वजनिक स्वच्छतागृहासांठी मनपाला आलेले 3 कोटी 85 लाख रुपये वर्षभर तसेच पडून होते व नंतर ते शासनाला परत गेल्याने यास जबाबदार कोण, असा सवाल स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी केला.
मंगळवारी स्थायी समितीस सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. प्रशासकीय कामातील दिरंगाईमुळे विकास कामांसाठी आलेला निधी खर्च न होता परत जात असल्याबाबत महापालिका स्थायी समितीने प्रशासकीय कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. महापालिकेवर प्रशासक येण्याची वाट अधिकारी पाहत आहेत का? असा सवाल त्यांनी केला.
शहरात उद्याने राहिली नाहीत. सर्व उद्याने ठेकेदारांच्या हवाली केली आहेत. त्यामुळे पैसे देऊनहीं उद्यानात सोयीसुविधा मिळत नाहीत असा मुद्दा उपस्थित करत सभापती कवडे यांनी उद्यानांमध्ये नागरिकांना योग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. वैयक्तिक शौचालयासाठी आलेले 4 कोटी रुपये परत गेल्याबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाईचा प्रस्ताव पुढील सभेत सादर करण्याचे आदेश सभापतींनी प्रशासनाला दिले.
तेव्हा मर्यादा पाळणार नाही
पदावर असल्याने आम्हाला मर्यादा येत आहेत. कार्यकाळ संपला की आम्ही मर्यादा पाळणार नाही, त्यावेळी मनपा प्रशासनाविरुद्ध अधिक आक्रमक होऊ, असा सूचक इशारा सभापती कवडे यांनी दिला. पाच हजार झाडे लावण्याच्या मोहिमेत ठेकेदार 600 झाडे लावल्याचे सांगतो, पण हिशोब मात्र त्याने अवघ्या 26 झाडांचाच दिल्याचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी सांगताच सदस्यांनी डोक्याला हात लावला, पण त्यावर भाष्य मात्र काहीच केले नाही.
खासदारांच्या नाराजीची दखल
महापालिकेत कामे विलंबाने होतात तसेच छाननी समितीची गरजच काय, अशा विविध मुद्यांवर खा. डॉ. सुजय विखे यांनी मध्यंतरी केडगाव, सावेडी व शहरातील जाहीर कार्यक्रमांतून नाराजी व्यक्त केली होती. त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. कवडेंसह पाऊलबुद्धे व जाधव यांनी नाराजी व्यक्त करताना मनपात छाननी समितीची गरज आहे काय, दोन-दोन महिने विकास कामांच्या फाईल्स पुढे सरकत नाहीत, निष्कारण त्रुटी काढल्या जातात, असे दावे केले. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी दर आठवड्यात दोन दिवस छाननी समिती बैठका होत असून, कोणत्याही कामाला विलंब होत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, खासदारांच्या नाराजीची दखल मनपा प्रशासनाने घ्यावी व विकास कामांच्या फाईल्स तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना सभापती कवडेंनी दिल्या.