श्रीगोंदा – महाविकास आघाडीचा विचार करता सध्या जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला शिर्डी अथवा नगर लोकसभा मतदारसंघांपैकी एक तरी जागा मिळालीच पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी असून तसा प्रस्ताव प्रदेश व राष्ट्रीय समितीकडे पाठविणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले, नगर जिल्हा काँग्रेसच्या संस्कृतीचा आहे. आजही जिल्ह्यात काँग्रेसचा मतदार पक्षाच्या पाठीशी उभा आहे, त्याला पक्षाला मते देण्याची संधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीत शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसकडे होती. आता शिवसेनेच्या सहभागाने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे जागावाटपाची समीकरणे बदलली आहेत. तरीही जिल्ह्यातील लोकसभेची कोणतीही एक जागा आम्हाला मिळावी, अशी आमची मागणी आहे. पक्षाकडे दोन्ही जागांसाठी सक्षम उमेदवार आहेत, जी जागा लढविण्याची संधी मिळेल, तिथे विजय मिळण्याची आम्हाला खात्री आहे.
देशमुख म्हणाले, पक्षांमधील अंतर्गत फुटीचा विचार करता सध्या महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वांत ताकदवान पक्ष आहे. तीच भूमिका ठेऊन जागावाटप होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या सगळीकडे जनतेतून काँग्रेसचा आवाज ऐकू येतोय, पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन त्याचा पक्षासाठी फायदा करून घेतला पाहिजे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतल्यास पुन्हा एकदा काँग्रेसला सुवर्णकाळ येईल, असा विश्वास विनायक देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके, भाऊसाहेब काळे उपस्थित होते.