संगमनेर – भारतीय जनता पक्षाचे नेते अमोल खताळ यांची संगमनेर संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मोठ्या कालावधीनंतर या योजनेला अध्यक्ष मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित कामांना वेग येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या योजनांचे आर्थिक साह्य संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीमार्फत मंजर केले जाते. समाजातील विविध माता – भगिनी व ज्येष्ठ नागरीकांना या योजनेतून लाभ दिला जातो.
या समितीचे अध्यक्ष म्हणून अमोल खताळ यांची पालकमंत्र्यांच्या शिफारशीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नियुक्ती केली आहे. या समितीचे शासकीय प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, नायब तहसीलदार हे असतात. अमोल खताळ यांच्या निवडीमुळे वरील योजनांचा समाजातील, तळागळातील लोकांना नक्कीच फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या निवडीमुळे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित कामांना आता गती मिळणार आहे.