पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पळवे खुर्द येथे सध्या शेतीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने जेमतेम आलेली उभी पिके धोक्यात आली आहेत. पाऊस नसल्याने आहे त्या पाण्यावर भरणे करून पिके जगवण्याचे काम सध्या पळवेकर करत आहेत. परंतु शेतीसाठीची दिवसाआड असलेली वीज देखील नियमित पुरवठा होत नसल्याने पळवेकर हैराण झाले आहेत.
महावितरणच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतात उभी पिके जळू लागली आहेत. याबाबत पळवेकरांनी आमदार नीलेश लंके यांची भेट घेऊन परिस्थिती विषद केली असून वीज पुरवठा सुरळीत करावा, असे साकडे घातले आहे.
सध्या ज्वारी आणि कांदा या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. गणपतीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे पाणीसाठा जेमतेम झाला असून त्यावर कांदा आणि ज्वारीचे पिक सध्या टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आता पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. ही पिके सध्या भरण्यावर टिकवली जात आहेत परंतु महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीज टिकत नाही, त्यामुळे ही उभी पिके जळू लागली.
यावेळी संपत पळसकर, दत्ता पळसकर, मोहन जाधव,प्रमोद कळमकर, गणेश पळसकर, बिपीन जाधव, दासु पळसकर, प्रकाश गाढवे, बाळासाहेब गाढवे, अनिल जाधव, निवृत्ती पळसकर, शिवाजी मगर, दादा महाराज कळमकर, बाळासाहेब पवार, प्रविण जाधव, बाबाजी जाधव, जयसिंग मेजर जाधव, प्रविण कळमकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.