नवी दिल्ली – जुलै 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दोषींना शिक्षा जाहीर केली आहे. न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची तर इतर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए.आर.पटेल यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असताना दुसरीकडे आरोपींच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.
न्यायाधीश ए.आर.पटेल यांनी 8 फेब्रुवारीला सर्व निर्णय देताना सर्व 49 आरोपींना दोषी ठरवले होते. न्यायालयाने 77 पैकी 28 आरोपींची सुटका केली होती. त्यामुळे या 49 आरोपींना काय शिक्षा दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार न्यायालयाने आज निर्णय दिला असून 38 जणांना फाशी तर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
2008 मध्ये अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 56 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 जण जखमी झाले होते. 26 जुलै 2008 रोजी हे बॉम्बस्फोट झाले होते. 26 जुलै 2008 ला झालेल्या 21 साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते.
याआधी 2 फेब्रुवारीला याप्रकरणी निकाल येणार होता. पण न्यायमूर्ती ए.आर.पटेल यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे 8 फेब्रुवारीपर्यंत तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर 8 फेब्रुवारीला सर्वांना दोषी ठरवण्यात आले. 26 जुलै 2008 रोजी फक्त एका तासात 21 बॉम्बस्फोट झाले होते. अहमदाबाद पोलिसांनी याप्रकरणी 20 तर सूरत पोलिसांनी 15 गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना तात्काळ सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.
जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम –
- 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट झाले.
- या बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते.
- या प्रकरणी अहमदाबादमध्ये 20 आणि सुरतमध्ये 15 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
- डिसेंबर 2009 पासून सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने सर्व 35 एफआयआर एकमध्ये विलीन केले.
- 1,163 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. 6 हजारांहून अधिक पुरावे सादर करण्यात आले.
- एकूण 78 आरोपी होते. एकजण सरकारी साक्षीदार बनला. त्यानंतर 77 आरोपींवर खटला चालवण्यात आला.
- 8 फेब्रुवारी 2022 रोजी 49 आरोपींना दोषी ठरवण्यात आले. 28 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
- विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी 6,752 पानांचा निकाल दिला.
- 49 दोषींपैकी 38 जणांना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.