नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेल्या अग्निवीर योजनेमुळे देशभारत गदारोळ सुरू आहे. अनेक ठिकाणी तरुणांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं आहे. मात्र सरकारने या तरुणांचा विरोध झुगारून सैन्यभरतीसाठी अग्निपथ योजनेची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार सहा वेगवेगळ्या श्रेणीतील अग्निवीरांची सैन्यात भरती करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासून, सैन्यातील विविध भरती कार्यालये भरतीसाठी भरती मेळाव्याची तारीख जाहीर करणार आहेत.
लष्कराच्या अधिसूचनेनुसार, सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. लष्कराच्या अधिसूचनेनुसार सर्व अग्निवीरांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर सर्वांना ऑनलाइन प्रवेशपत्र दिले जातील. या प्रवेशपत्रानेच भरती मेळावा घेण्यात येईल. जर एखादा उमेदवार बनावट प्रवेशपत्र घेऊन भरती मेळाव्यात पोहोचला तर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. अग्निवीरांना शालेय परीक्षेत किती गुण असावेत हेही अधिसूचनेत लिहिले आहे.
लष्कराच्या अधिसूचनेमध्ये अग्निवीरांना शारीरिक तंदुरुस्ती आणि फिटनेस चाचणीसाठी आवश्यक निकष जारी करण्यात आले आहेत. आजवर सैन्य भरतीसाठी जे केले नियम होते, तेच नियम कायम आहेत. परंतु माजी सैनिकांच्या मुलांना म्हणजे आणि वीर नारींना शारीरिक तंदुरुस्तीमध्ये थोडी सूट मिळणार आहे.
अधिसूचनेनुसार अग्निवीरांची भरती तीन टप्प्यात केली जाणार आहे. पहिली शारीरिक चाचणी, दुसरी वैद्यकीय चाचणी आणि तिसरी लेखी परीक्षा. अधिसूचनेनुसार, एनसीसी कॅडेट्सला लेखी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळतील. याशिवाय उमेदवाराकडे क्रीडा प्रमाणपत्र असेल तर त्याला लेखी परीक्षेत स्वतंत्र बोनस गुणही मिळतील.