सिकंदराबाद, – लष्करातील भरतीच्या संदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला जोरदार विरोध होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले जात आहे. 17 जून रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर एक पूर्ण रेल्वेगाडी पेटवण्यात आली होती. त्याचा आता चौकशीतून खुलासा झाला आहे. कोचिंग सेंटर्सच्या मालकांनी विद्यार्थ्यांना भडकावल्यामुळे हा प्रकार घडल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
हिंसाचारात सहभागी झालेले युवक अगोदरच तेलंगणाच्या विविध भागांतून हैदराबाद येथे दाखल झाले होते. जाळपोळीच्या एक दिवस अगोदरच पेट्रोल भरलेल्या बाटल्या आणून ठेवल्या गेल्या होत्या. तसेच जे युवक या जाळपोळीत सहभागी झाले त्यांनी घटनेच्या अगोदरच रेल्वे स्थानकावर पाहणी केली होती.
स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजवरून ही बाब समोर आली आहे. आंदोलन करणारे युवक तीन बाजूंनी स्थानकांत दाखल झाले होते. यातील 300 पेक्षा जास्त जण अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. एकूण 1500 जणांचा जमाव तेथे जमला होता व त्यांनी जाळपोळ सुरू केली. तपास केल्यानंतर पोलिसांनी कोचिंग सेटरच्या मालकाला अटक केली आहे.