प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवा आणि पुणे बार असोसिएशन (पीबीए) यांच्या विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील प्रादेशिक वकील परिषद व कार्यशाळा वाघोलीत आयोजित करण्यात आली होती. परिषदेत मुख्य विषय हा “दस्त नोंदणी कौशल्यपूर्ण विकास’ होता. परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे तसेच महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे उपस्थित होते.
“मिळकतीचे हस्तांतर करताना वकिलांनी घ्यायची काळजी’ या अनुषंगाने चर्चासत्र घेण्यात आले. उद्घाटन सत्रात परिषदेचे संयोजक बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. राजेंद्र उमाप यांनी “पुणे विभागात मिळकतीची हस्तांतर संबंधित कामे करणारे अनेक वकील असून त्यांनी या चर्चासत्रामधील माहितीचा उपयोग करून उच्च दर्जाची वकिली करावी,’ असे आवाहन केले.
महाराष्ट्र वकील परिषदेचे राष्ट्रीय सदस्य ऍड. जयंत जायभावे यांनी देखील मिळकतीचे काम करताना वकील वर्गाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच परिषदेमध्ये दस्त नोंदणी क्षेत्रातील पस्तीस वर्षाहून अधिक प्रॅक्टिस असलेल्या 11 ज्येष्ठ वकिलांचा सत्कार
करण्यात आला.
परिषदेच्या पहिल्या सत्राची सुरवात “मिळकतीच्या हस्तांतरासाठी लागणाऱ्या परवानग्या व संबंधित कायदे’ याच्या चर्चेने झाली. त्यात ऍड. जायभावे, ऍड. सुधाकर आव्हाड, ऍड. नरेश गुगळे, ऍड. सखाराम कोळसे-पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी जायभाये यांनी वकिलांचा सत्कार केलाबद्दल ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. हर्षद निंबाळकर आणि ऍड. पठाण आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत कानेटकर यांनी टायटल तपासणी व त्यातील कायदेशीर पूर्तता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
ऍड. हर्षद निंबाळकर यांनी टायटल करताना वकील वर्गावर होणाऱ्या फौजदारी कारवाई यासंबंधी चर्चा केली.
तर, तिसऱ्या सत्रात पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी तरुण वकील वर्गांस मार्गदर्शन केले.