कराड – लोकशाही संपवून हुकूमशाही स्थापित करायचा घाट देशात घातला जातोय. यातून फक्त कॉंग्रेसची विचारधारा देशाला वाचवू शकते. त्यामुळेच कॉंग्रेसचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जातियवादी आणि धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मोठ्या मनाने एकत्र येत कॉंग्रेसच्या विचारधारेबरोबर सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत. ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना प्रदेश कार्यकारिणीवर काम करण्याची संधी देणार असल्याची घोषणा महसूल मंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. जिल्ह्यात कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील पंकज हॉलमध्ये शुक्रवारी झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, विलासराव पाटील-उंडाळकर, ऍड. उदयसिंह पाटील, डॉ. सुरेश कुऱ्हाडे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. थोरात म्हणाले, देशाची लोकशाही जशी धोक्यात आहे, तशीच अर्थव्यवस्थाही धोक्यात आहे. ती वाचवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. हे काम कॉंग्रेसची विचारधाराच करू शकते. अमेरिकेतील हुकूमशहाला तेथील जनतेने घरी बसवले, तसेच आपल्या देशातील हुकूमशहालाही जनता घरी बसवणार आहे. त्याची सुरुवात सर्वांनी आपल्या घरापासून केली पाहिजे. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी व सर्वसामान्यांविरोधी असल्याचे लोकांना पटवून दिले पाहिजे.
गेल्या पाच वर्षात आपण महाराष्ट्रात “अशी ही बनवाबनवी’ हा कार्यक्रम पाहिला. केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. करोना काळात नेमकी दूध पावडर निर्यातबंदी तर आता सरकार कांद्याची आयात करणार आहे. त्यात शेतकरीविरोधी कायदे केले आहेत. त्यांना विरोध केला पाहिजे. काका-बाबा यांच्यात वैचारिक मतभेद होते; पण मनभेद नाहीत. यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात कॉंग्रेसच्या विचारांच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील कॉंग्रेसला बळ मिळणार आहे. काका-बाबांनी जिल्ह्यात कॉंग्रेसला उभारी द्यावी. आम्ही त्यांना संपूर्ण ताकद देऊ.
जिल्ह्याची राजकीय दिशा बदलणार
आ. चव्हाण म्हणाले, काका व मी एकमेकांच्या विरोधात लढलो. त्यात कॉंग्रेसची ताकद क्षीण झाली. त्यामुळे भाजपला जिल्ह्यात चंचूप्रवेशाची संधी मिळाली. जातियवादी पक्षांना राज्यात वर्ण व्यवस्था आणायची आहे. त्यांना फक्त कॉंग्रेसची विचारधारा रोखू शकते. येथे झालेली बिघाडी दुरुस्त करण्याची जबाबदारी घेतली आहे. दरम्यानच्या काळात ऍड. उदयसिंह पाटील यांच्याशी भेटी झाल्या. मतभेदांमुळे कॉंग्रेसचे नुकसान झाले. त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. काकांनी त्याला आशीर्वाद दिला. या कामी मी स्वतः थोरात यांना भेटलो आणि एकत्र काम करायचा निर्णय झाला. या निर्णयामुळे कोणावरही अन्याय होणार नाही.
विलासकाका म्हणाले, कॉंग्रेस ही चळवळ आहे. या विचारधारेवर महात्मा गांधी, नेहरूंनी काम केले. काही लोक नेहरू घराण्याचा द्वेष करत आहेत. नोटबंदी, शेतकरीविरोधी कायदे करून सर्वसामान्य माणूस व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. जुन्या-नव्या पिढीची सांगड घालत काम करताना काका, बाबा व वरिष्ठ नेत्यांनी ताकद द्यावी, असे ना. कदम, ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले. मनोहर शिंदे स्वागत केले. प्रा. धनाजी काटकर यांनी प्रास्ताविक केले. शिवराज मोरे यांनी आभार मानले.