एकही तक्रार नाही : आज अंतिम दिवस, आता प्रतीक्षा निकालाची
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षा गुरूवारपासून सुरू झाली. काही किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता दिवसभरात 5 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. दरम्यान, फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांची कोणतेही तक्रार आली नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होत आहे. तांत्रिक अडचणी, अतिवृष्टी, एका दिवशी दोन परीक्षा अशा विविध कारणांमुळे परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दि.5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परीक्षेबाबत विविध तक्रारी असणाऱ्या, विद्यार्थ्यांचीही परीक्षा होणार आहे.
या परीक्षेसाठी सुमारे 27 हजार विद्यार्थी अपेक्षित आहे. गुरुवारी झालेल्या परीक्षेत साधारण साडेअकरा हजार विद्यार्थ्यांची 634 विषयांसाठी परीक्षा होणार होती. मात्र, त्यापैकी केवळ पाच हजार विद्यार्थ्यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत परीक्षा दिली.
दोन ते तीन विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत तक्रार होती. त्यांची तक्रार तातडीने सोडवण्यात आली. फेरपरीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या असल्याने, अनुपस्थित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याची शक्यता आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे रात्री आठ वाजेपर्यंत कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. विद्यार्थ्यांना तक्रारी असल्यास, त्यांनी थेट विद्यापीठाकडे नोंदवाव्या, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.