मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे लहान बंधू सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर राज्यातील राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कारवाईवरून केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सदानंद कदम यांच्यावरील अटकेत आदित्य ठाकरे यांनी, “देशभरातील विरोधकांवर तसेच जी लोक सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशा कारवाई होत आहे. अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याची गरजही नाही, कारण सरकारला आमची भीती वाटते. आम्ही सगळे ‘इंसाफ के सिपाई’ म्हणून आम्ही लढत आहोत. असे प्रकार आता देशभरात सुरू आहेत. त्यामुळे देशात राजकीय स्वातंत्र आणि लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न पडतो”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच २०२४ ची निवडणूक ही या देशातील शेवटची निवडणूक असणार आहे असे म्हटले आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी,“गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंसह देशभरातील विरोधाकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते. इथे महाराष्ट्रातही ज्यांनी गद्दारी केली. त्यांच्याविरोधातील प्रकरणं आता शांत झाली आहेत. जे लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्याविरोधात खोटी तडीपारीची नोटीस आणि खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा प्रकारे कोणतंही राज्य चालू शकत नाही.”असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी जात विचारली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे, यासंदर्भातही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “देशात आणखी किती वाद निर्माण करायचे, हे आता सरकारने ठरवले पाहिजे. आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. कदाचित केंद्र सरकारला यातून माहिती गोळा करायची असेल. पण हे सर्व होत असताना ज्याला हिंदुस्थानी म्हणून आपली जात लिहायची आहे, ते तसही लिहू शकतात”, असे ते म्हणाले.