सोलापूर – केंद्र सरकार जनता विरोधी प्रतिगामी धोरणांची अंमलबजावणी करत आहे. याचा थेट फटका या देशातल्या सर्वहारा वर्गाला बसत आहे. एकीकडे करोना महामारीने सर्वसामान्य माणसाचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. त्यात वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, पेट्रोल, डीझेल, घरगुती गॅस भरमसाठ दरवाढ झालेली आहे. वास्तविक लोकांना रोजगार मिळत नाही. महागाईच्या वाढीव दरानुसार पगार मिळत नाही.
यामध्ये केंद्र सरकारने 29 कामगार कायद्यांचे 4 श्रमसंहितामध्ये रुपांतर करून त्याची धार बोथट केली आहे. यामुळे कामगारांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागणार आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
केंद्रीय कामगार संघटना कृती समिती व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. या अनुषंगाने आडम मास्तर व सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
नरसय्या आडम म्हणाले, सरकारी नोकऱ्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त जागा रिक्त असूनही भरती केली जात नाही. असंघटीत उद्योगधंद्यात कामगार श्रम संहितामुळे शाश्वत रोजगारांच्या संधी कमी झाल्या आहेत. किमान वेतनाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक टाळली जात आहे. कामाच्या तासात वाढ होऊन त्यांना मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षांमध्ये घट होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सरकारने मनरेगाच्या अर्थ संकल्पीय तरतुदीत कपात केली आहे.
सार्वजनिक आरोग्य व शिक्षणाला तिलांजली दिली जात आहे. तर सर्वसामान्य जनतेच्या अन्न अधिकारावरही घाला घातला गेला आहे. या एकूण परिस्थितीत सार्वजनिक उद्योगधंद्याचे खाजगीकरण, खाजगी भांडवलदारांना अमाप सवलती व सर्वसामान्य जनतेच्या अधिकारावर आलेले गंडांतर यामुळे क्रयशक्ती कमी झाली आहे. याच्या विरुद्ध जनतेत असंतोष असून देशातला विडी उद्योग सुद्धा पूर्णतः संपण्याच्या मार्गावर आहे.
तसेच यंत्रमाग कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षेचा लाभ देण्याचे शासनाचे आदेश असताना सुद्धा त्याच अंमलबजावणी होत नाही. अशा या विडी व यंत्रमाग कामगारांना कदापीही विस्थापित होऊ देणार नाही, असा एल्गार कॉ. नरसय्या आडम यांनी पुकारला.