बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. वयाच्या 60 व्या वर्षात त्यांनी लग्न केल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. यावरून त्यांनी नेटकऱ्यांना सडेतोड उत्तरही दिले होते. त्यानंतर आता हे कपल व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या हे दोघे बाली या ठिकाणी आहेत.
रुपाली आणि आशिषने त्यांचे काही रोमॅंटिक फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रुपालीने शेअर केलेल्या फोटोला ‘ ग्लोरी ऑफ टुगेदरनेस’ असे कॅप्शन दिले आहे. आशिष विद्यार्थी यांनी आसाममध्ये राहणाऱ्या रुपालीशी त्यांनी आसामी रितीरिवाजानुसार लग्न केले. मात्र लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना आशिष विद्यार्थी यांनी चांगलेच सुनावले होते.
एका मुलाखतीदरम्यान आशिष म्हणाले होते की, “मी म्हातारा आणि त्यासारखे अनेक अपमानास्पद शब्द माझ्याबद्दल वाचले आहेत. विनोदाचा भाग म्हणजे म्हातारा ही कमेंट प्रत्येकजण आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्यांसाठी वापरत आहे. पण, त्यासोबतच आपण स्वतःला एक भीती दाखवत आहोत. कारण, आपल्यापैकी प्रत्येक जण म्हातारा होणारच आहे. आपण स्वतःला म्हणतो की, तुम्ही म्हातारे झाल्यानंतर काही करू नका. याचा अर्थ तुम्हाला दुःखी मरायचे आहे का? जर एखाद्याला सहवास हवा असेल तर त्याने लग्न का करू नये?” असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
View this post on Instagram
आशिष पुढे म्हणाले, “एखादा माणूस म्हातारा झाल्यावर त्याची काळजी कोण घेणार? जे लोक कमेंट करत आहेत त्यांच्यापैकी कोणीही येऊन माझ्याकडे लक्ष देणार आहे का? हे फक्त नातेसंबंधांबद्दल नाही, तर लोकांना खूप गोष्टी करायच्या असतात पण लोक काय म्हणतील? हा विचार करून ते स्वतःला आवडीच्या गोष्टी करण्यापासून रोखतात. प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण प्रत्येकासाठी या भिंती का तयार करत आहोत? ट्रोल करण्यापेक्षा एकमेकांना आधार दिला पाहिजे.”
दरम्यान, आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले. कोलकात्याच्या एका क्लबमध्ये त्यांनी आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्न केले. रुपाली बरुआ ह्या फॅशन उद्योजक आहेत. यापूर्वी आशिष विद्यार्थी यांचा विवाह अभिनेता शकुंतला बरुआची मुलगी राजोशी बरुआ यांच्याशी झाला होता.