हर्षद कटारिया
बिबवेवाडी – गेल्या दोन वर्षांत कोणत्याच निवडणुका होत नसल्याने राजकीय वातावरण थंडावले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पुण्यात महत्वाचे कॉंग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर तर भाजप पक्षाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ तर मनसे पक्षाला राम राम ठोकत वंचितकडून निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरलेले वसंत मोरे अशी रंगतदार लढत होत आहे.
महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा (कसबा सोडून) अशी कोणतीच निवडणूक गेल्या दोन ते तीन वर्षांत झाली नसल्याने तसेच पक्ष फुटी व नवीन राजकीय समीकरणे यांची गुंतागुंत थांबून चित्र स्पष्ट झाल्याने आता राजकीय आखाड्यात उतरलेल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.
मतदारसंघात पक्षीय वातावरण ढवळून निघत असून आमचा उमेदवार कसा निवडून येणार याची गणिते राजकीय कार्यकर्ते व पदाधिकारी पटवून सांगत आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या फोटोवर प्रचार सुरू असून सोशल मीडियावर प्रसिद्धीचा जोर वाढला आहे. भाजप पक्षाकडून स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडे प्रचाराची धुरा आहे. तसेच, पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना बळ देत आहेत. दुसरी कडे कॉंग्रेस पक्षाचे अभय छाजेड, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळासाहेब ओसवाल, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अश्विनी कदम या सर्वांनी प्रचाराची जबाबदारी दिलेली आहे.
जैन समाजाचे मताधिक्य…
पर्वती मतदारसंघात भाजप पक्षाचे मताधिक्य जास्त असल्याचे गेल्या काही वर्षांत पाहण्यास मिळाले मात्र शिवसेनेला ठाकरे गट यांना मानणारा गट एकगठ्ठा मतदान ही मोठे आहे. अभय छाजेड यांनी अनेक वर्षे आपला दबदबा कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून येथे ठेवला आहे. जैन समाजाचे मोठ्या संख्येने मतदान या मतदार संघात आहे, तर पालिकेत वरिष्ठ पदावर असणाऱ्या व अनेक वेळा नगरसेविका म्हणून काम पाहणाऱ्या अश्विनी कदम यांचाही दांडगा संपर्क आहे. एकूणच निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्ते अनेक दिवसांनी राजकीय प्रचारासाठी ‘रिस्टा’र्ट झाल्याचे चित्र आहे.