शासन आदेश : नागरिकांची होणार सोय
पिंपरी – मनमानी वेळेनुसार, कधी तरी उघडणाऱ्या आणि सतत “उद्या या’ असे म्हणणारे रेशन दुकानदार आता शासनाच्या रडारवर आले आहेत. शासनाकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार रेशन दुकाने ही निर्धारित वेळेत उघडी न ठेवल्यास, ग्राहकांना माल न देता परत पाठवल्यास तसेच दर्शनी भागात सूचना फलक न लावल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे नुकतेच दिले आहेत.
राज्यातील गरीब, गरजू तसेच पात्र लाभार्थ्यांना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे एक माध्यम आहे. या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील महत्त्वाचा भाग असलेले रास्तभाव/शिधा वाटप दुकाने अर्थात रेशन दुकाने ही जीवनावश्यक वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, या जीवनावश्यक वस्तू विहित वेळेत जनतेमध्ये वाटप करणे गरजेचे असताना दुकानदाराकडून मात्र या ग्राहकोपयोगी वस्तूचे वेळेत, नियमित आणि दररोज वाटप होत नसल्याची तक्रार मोठ्या प्रमाणात येत आहे. हे टाळण्यासाठी शासनाने दि. 9 मार्च रोजी परिपत्रक काढून रेशन दुकानदारांना दुकान संपूर्ण वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रेशन दुकानदारांकडून ग्राहकोपयोगी वस्तूचे वाटप सुस्थितीत होण्यासाठी दुकाने सकाळी व दुपारी प्रत्येकी चार तास उघडी ठेवण्यात यावीत. स्थानिक परिस्थितीनुसार याबाबतच्या नेमकी वेळ अप्पर जिल्हाधिकारी/नियंत्रक शिधा वाटप, मुंबई यांनी निश्चित कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे. तसेच ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरत असतो अशा ठिकाणी आठवडा बाजाराच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्यात यावीत.
विविध कारखाने/उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी रास्तभाव/शिधावाटप दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत आदी सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त संसदीय लोकलेखा समितीने केलेल्या सूचना आणि नियंत्रण आदेश, 2015 च्या कलम 10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनेचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा शासनाने परित्रकातून दिला आहे. शासनाने दिलेल्या सूचनेचे कितपत पालन होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
दुकानाच्या फलकावर या सूचना लिहिणे बंधनकारक
रेशन दुकानातील फलकावर वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मूल्य, अन्नधान्याची पात्रता, दुकान उघडणे व बंद करण्याची वेळ, भोजनाची वेळ, अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण, काही तक्रार असल्यास ती कोणत्या अधिकाऱ्याकडे कराव्यात याबाबतची माहिती, तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाइन क्रमांक इ. माहिती फलकावर देणे बंधनकारक आहे.
कोणत्याही दिवशी द्यावे लागणार धान्य
महिन्याच्या कोणत्याही दिवशी म्हणजे महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत लाभधारक रेशन दुकानात रेशन घेण्यास आल्यास त्याला दुकानदाराने धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील, असे न केल्यास त्या दुकानदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सूचना फलकावरील अहवाल संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी व नियंत्रक, शिधावाटप यांनी एक महिन्याच्या आत करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.