वाघोली- दिव्यांगांचे हक्क डावलणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. वाघोली (ता. हवेली) येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रसाद म्हणाले की, दिव्यांगांच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असताना अनेक ठिकाणी हा निधी खर्च केला जात नाही. हे दिव्यांगांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्यासारखे आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबविणार आहे.
यावेळी प्रसाद यांच्या हस्ते दिव्यांगास व्हिलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग व्यक्तींना धर्मेंद्र सातव यांच्या तर्फे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दिव्यांग हक्क कायदा पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी विविध मागण्यांचे फलक घेऊन दिव्यांगानी जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सन्मान आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, धर्मेंद्र सातव, महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस गणेश कुटे, हरिदास शिंदे, अनिता कांबळे, विजय पगडे, साहेबराव जगताप, बापू कोपरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुप्रिया लोखंडे यांनी केले.
- दिव्यांगांना हक्काचे घर मिळवून देणार : अशोक पवार
आमदार अशोक पवार म्हणाले की, शहरांमध्ये बाहेरच्या राज्यातील अनेक नागरिकांना शासनाच्या वतीने घरे दिली जात आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांग देखील नागरिक आहेत. त्यांनाही हक्काची घरे मिळवून देण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून प्रयत्न करणार आहे. धर्मेंद्र सातव हे जिल्ह्यात अंपग बांधवाना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. - अपंग बांधवांसाठीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या वतीने प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त निधी दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे माध्यमातून लवकर मिळावा, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
– गणेश कुटे, सरचिटणीस, भाजपा प्रदेश युवा मोर्चा, महाराष्ट्र.