पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेतकर्याला डमी आडत्याने मारहाण केल्याच्या घटनेची पडसाद उमटल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारपासून (दि.५) बेकायदा डमी आडते आणि गाळ्याच्या समोर १५ फुटापेक्षा जास्त जागा वापरणार्यांवर कारवाई सुरू केली आहे.
पहिल्याच दिवशी व्यापार प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले बाजार समितीचे संचालक गणेश घुले, अनिरुद्ध उर्फ बापू भोसले यांच्या गाळ्यावर कारवाई केली. १५ फुटापेक्षा जास्त जागा वापरल्याने ही कारवाई केली आहे. कोणाला पाठीशी घालणार नसल्याचा सभापती दिलीप काळभोर यांनी दिलेला शब्द पाळला आहे.
दोन्ही संचालकांना प्रत्येकी ५ हजार ९०० रुपयांचा दंड आकारला आहे. आता यापुढे कारवाईत सातत्य राहणार का, हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. बाजार समितीत फळबाजारात एका बेकायदा डमी अडत्याणे शेतकऱ्याला कानशिलात लगावत लाथा घातल्या होत्या. शेतकरी मारहाण प्रकरणानंतर बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी सोमवारी (दि.५) पत्रकार परिषद घेत गाळ्यवरील बेकायदा डमी अडत्या आणि गाळ्या समोरिल १५ फुटाच्या बाहेरील वापर करणाऱ्या जागांवर देखील कारवाई करण्याची घोषणा केली होती.
बाजारातील आडते व व्यापारी गटातील गणेश घुले आणि अनिरूध्द भोसले या दोन्ही संचालकांच्या गाळ्यांवर डमींची संख्या जास्त असून गेट नंबर एक आणि गेट नंबर तीनवर रस्त्यावर व्यापार करून वाहतुकीला अडथळा होतो. मात्र, या दोन्ही संचालकांकडे कारवाई होत नव्हती. त्यामुळे बाजारातील आडते प्रशासनाला जुमानत नव्हते.
मात्र या दोन्ही संचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सभापती दिलीप काळभोर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते . त्यानुसार बाजार समितीचे नवनिर्वाचित फळे व तरकरी विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी मंगळवारी कारवाईची मोहीम हाती घेतली. पहिल्याच दिवशी ९ जणांवर कारवाई करत १९ हजार ४७० रुपयांचा दंड वसूल केला. यामधे बाजार समितीचे संचालक गणेश घुले, अनिरुद्ध उर्फ बापू भोसले यांच्या गाळ्यावरदेखील कारवाई करण्यात आली.
दुबार विक्रेत्यांवरही होणर कारवाई
मार्केट यार्डात कांदा बटाटा विभागात कांदा, बटाट्याची आवक होते. तेथून माल खरेदी करून त्याची तरकारी विभागात दुबार अथवा किरकोळ विक्री होत आहे. हे बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे दुबार अथवा किरकोळ विक्री करू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारे विक्री करणार्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.