गोष्ट आहे तशी जुनी. 1981 सालातली. तेव्हा विजय नवल पाटील हे दूरसंचार खात्याचे केंद्रीय मंत्री होते. खानदेशात त्यांनी एक शैक्षणिक संस्थाही सुरू केली होती. या संस्थेचे एक माध्यमिक विद्यालय नवलनगरमध्ये सुरू झाले होते. दरवर्षी एक वर्ग वाढत वाढत पाचवीपासून नववीपर्यंतचे वर्ग सुरू झाले होते. पण शाळेला अजून अनुदान सुरू झाले नव्हते. त्यामुळे शिक्षकांना पगार मिळत नव्हते. मात्र गंगाराम चौधरी नावाच्या शिक्षकाला संस्था दरमहा 150 रुपये पगार देत होती. कारण त्यावेळी बी.एस्सी. झालेले गणित, विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक मिळत नव्हते. विशेषतः ग्रामीण भागात ते मिळत नसत.
शाळेला अनुदान मिळावे म्हणून शिक्षण खात्याकडे प्रस्ताव पाठवलेला होता. त्यावेळी शरदचंद्रिका पाटील या महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री होत्या. त्या चांगल्या उच्च विद्याविभूषित होत्या. शैक्षणिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण होती. त्यावेळी त्या खानदेशच्या दौऱ्यावर येणार होत्या. त्या नवलनगरमध्येही येणार होत्या. शाळेला भेट देणार होत्या. जमलं तर एखाद्या शिक्षकाचा पाठही पाहणार होत्या. तशी इच्छा त्यांनी संस्थाचालकांकडे व्यक्त केली होती. त्या दिवशी काही स्थानिक कार्यक्रमही होते. त्या कार्यक्रमांनाही शिक्षणमंत्री हजेरी लावणार होत्या. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या कार्यक्रमाची आखणी झाली होती. म्हणून विजय नवल पाटील यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना अनेक सूचना दिल्या होत्या. त्यात एका ज्येष्ठ शिक्षकाने अप्रतिम आदर्श पाठ घेऊन दाखवावा म्हणजे शिक्षणमंत्री खूश होतील आणि शाळेच्या अनुदानाचे काम होऊन जाईल, असे सूचित केले होते.
संस्थाचालकांच्या आदेशाप्रमाणे मुख्याध्यापकांनी शिक्षकांची मीटिंग घेतली. त्यात शाळेची शिस्त, स्वच्छता, फलकलेखन, रांगोळी, वर्गसजावट असे अनेक मुद्दे चर्चिले गेले. नंतर मुद्दा निघाला तो आदर्श वर्गपाठ घेऊन दाखवण्याचा. तर प्रत्येक शिक्षक, “”मी नाही तास घेणार. मला दडपण येतंय. ताण जाणवतो. मी अहिराणी बोलीत बोलतो. मला प्रमाण मराठी भाषा बोलता येत नाही.” अशी अनेक कारणे सांगितली. मग मुख्याध्यापकांनी शिक्षकांची भूमिका संस्थाचालकांना कळवली. नंतर एकेदिवशी स्वतः संस्थाचालक विजय नवल पाटील यांनी शिक्षकांची सभा घेतली. तरीही आदर्श पाठ घेऊन दाखवायला शिक्षकांची नकारघंटाच. मग त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे त्यांच्या खोलीत बोलावून कारणे विचारली. त्यांची प्रत्येकाची कारणे ऐकून ते भडकले आणि रागाने म्हणाले,
“”तुम्हाला जर शिक्षणमंत्र्यासमोर पाठ घेता येत नसेल तर नोकरी कशाला करता? काम सोडून घरी बसा.”
मात्र, जेव्हा गंगाराम चौधरी नावाचे तेवीस वर्षीय तरुण शिक्षक म्हणाले, “”मी पाठ घेऊन दाखवीन, पण त्या ज्येष्ठ शिक्षकांनी परत तक्रार करायला नको. आम्ही ज्येष्ठ असूनही आम्हाला डावललं. संधी दिली गेली नाही. मी त्यांच्यामानाने फार नवीन आहे. चारच महिन्यांपूर्वी मी इथं लागलोय.”
या तरुण उमद्या शिक्षकाचे उत्तर ऐकून संस्थाचालक खूश झाले. त्यांची काळजी मिटली. आणि पाठीवर थाप टाकून म्हणाले, “”चांगला पाठ घेऊन दाखवा.” आणि ठरल्याप्रमाणे एकेदिवशी शरदचंद्रिका पाटील बाई शाळेत आल्या. मुख्याध्यापकांनी त्यांचे स्वागत केले. शाळेचा परिसर फिरून दाखवला. चहापान झाले. बाईंनी पाठ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून मुख्याध्यापकांनी नववीच्या वर्गावर बाईंना नेले. तेथे गंगाराम चौधरी हे शिक्षक मुलांना बीजगणित शिकवत होते. ते शिकवत असलेल्या प्रकरणाचे नाव होते “बैजिक समीकरणे.’
शिक्षणमंत्री वर्गात येताच मुलांनी त्यांना सन्मानाने उत्थापन दिले. त्यांनी मुलांकडे हसून पाहिले. आणि हाताने खाली बसण्याची खूण केली. बाई पाठीमागे बसून पाठ निरीक्षण करू लागल्या. मुलांना हा प्रकार नवीनच वाटत होता. ही बातमी गावकऱ्यांपर्यंत पोहोचली होती. म्हणून गावचे शेतकरी, शेतमजूर, तरुण मुले, कार्यकर्ते शाळेच्या पटांगणात जमा झाले होते. काही मुले तर त्या वर्गाच्या खिडकीतून, दरवाज्यातून हळूच डोकावून बघत होती आणि बंदोबस्तावर असलेले पोलीस त्यांना तेथून पिटाळत होते.
बाई मन लावून पाठाचे निरीक्षण करीत होत्या. हातातील पेनाने समोरच्या कागदावर काहीतरी शेरे लिहीत होत्या. मुलांना अवघडल्यासारखे झाले होते. काही मुले हळूच मागे वळून, बाई काय करतात ते चोरट्या नजरेने पाहात होती. चौधरी सरांनी साठ मिनिटांचा तास घेऊन दाखवला. बाई खूश झाल्या. त्या त्यांच्या जागेवरून उठल्या. फळ्याजवळ आल्या आणि खुशीने त्यांनी तरुण शिक्षकाची पाठ थोपटली. शाबासकी देऊन बाई वर्गाबाहेर पडल्या. चौधरीसरांचा तास यशस्वी झाला होता. शिक्षणमंत्र्यांची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडली होती. शिक्षकाला यापेक्षा वेगळं काय हवं असतं? ती कौतुकाची थाप, केवळ थाप नव्हती तर ती यशस्वी अध्यापनाची पोहोचपावती होती. कुठल्याही कागदी प्रमाणपत्रापेक्षा हे शाबासकीचे प्रमाणपत्र श्रेष्ठ होते.
आज वयाच्या बासष्ठाव्या वर्षीही चौधरी सरांना तो मोरपंखी प्रसंग आठवतो, आणि मनावरून हळुवारपणे मोरपंख फिरल्यासारखे वाटते. माणसाला त्याच्या उत्तरायुष्यात, पूर्वायुष्यातील असे सुखद प्रसंग हटकून आठवतात. आणि असे प्रसंग जीवनाची चव वाढवून जातात.
डॉ. दिलीप गरूड