मुंबई – अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या तिच्या कमबॅकमुळे चांगलीच चर्चेत आहे. आता रिया चक्रवर्तीचे आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे. तब्बल तीन वर्षांनंतर तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. आजकाल ती एमटीव्हीच्या ‘रोडीज 19’ शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे, ज्यामध्ये ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि कठीण काळाबद्दल बोलताना दिसते. आता अभिनेत्रीने तिचा प्रियकर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अकाली निधनानंतर तिचे आयुष्य कसे होते याबद्दल सांगितले आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला मीडिया कव्हरेज आणि अभूतपूर्व द्वेषाचा सामना करावा लागला होता याबद्दल तिने नुकतंच सांगितले आहे. ‘रोडीज सीझन 19′ मध्ये रियाने एका स्पर्धकाशी संवाद साधला होता, यावेळी अभिनेत्रीने तिच्या संघर्षांबद्दल खुलासा केला. स्पर्धकाची गोष्ट ऐकल्यानंतर अभिनेत्रीने तिची कथा शेअर केली आणि तिला विविध नावांनी हाक मारणाऱ्या लोकांबद्दल देखील सांगितले.
यावेळी बोलताना रिया म्हणाली की, “अनेक लोक अनेक गोष्टी सांगतात… लोकांनीही मला अनेक गोष्टी सांगितल्या… त्यांनी मला कोणत्या नावांनी हाक मारली, त्यांनी माझ्याबद्दल काय सांगितले, पण माझ्याबद्दल जे बोलले गेले ते मी स्वीकारावे का? त्यांच्यामुळे मी माझ्या आयुष्यात थांबू का? अजिबात नाही…’
रिया पुढे म्हणाली की, ‘लोकांनीही मला खूप काही सांगितले आहे, पण मी त्यांच्या आवाजाला काही महत्त्व देणार का? नाही, माझा आवाज आहे आणि तुझाही. तुम्ही त्याचे ऐका शेवटी हे लोक कोण आहेत? त्यामुळे स्वतःचे ऐकावे…’ असं देखील रिया यावेळी म्हणाली. यावेळी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने आपल्या कठीण काळाबद्दल अनेक महत्वाचे खुलासे केल्याचे दिसून आले.