परभणी – जिल्ह्यातील गंगाखेडमधील भारतीय सैन्य दलात कार्यात असणारे लक्ष्मण रामराव तांदळे (वय ३२) यांना वीरमरण आले आहे. कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी जयपूर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १४ वर्षांपासून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर गंगाखेड तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.
अलोर (राजस्थान) येथे लष्करात तांत्रिक विभागात सेवेत तांदळे कर्तव्यावर होते. वीरजवान लक्ष्मण तांदळे यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावरून गंगाखेड शहरात दुपारी १ वाजता आणण्यात आले. त्यानंतर वीरजवान त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.२६) दुपारी ३ वाजता तालुक्यातील तांदुळवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, चार बहिणी असा मोठा परिवार आहे.
तांदळे यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहिले होते. तेव्हा भारत माता की जय, वंदे मातरम, जवान लक्ष्मण तांदळे अमर रहेच्या घोषणा देत लक्ष्मण तांदळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.