कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याकडे घेऊन कडवी झुंज देणाऱ्या भाजपची स्थिती आता बिकट होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी तृणमूलमध्ये घरवापसी केल्यांनतर भाजपमधील 24 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू सरकार यांनी पक्षाच्या आमदारांसोबत राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. मात्र या बैठकीला भाजपच्या 74 पैकी केवळ 50 आमदारांनीच हजेरी लावली. 24 आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. त्यातच आता हे 24 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान आमदारांनी सुवेंदू अधिकारींचं नेतृत्व अमान्य करण्यासाठीच दांडी मारली का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपमधील अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे हे नाराज आमदार मुकूल रॉय यांच्या पावलावर पाऊल ठेवून घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.
दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संकेत दिले की, मुकूल रॉय यांच्यासोबत पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासंदर्भात आपण सकारात्मक आहोत. तसेच 30 हून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.