विविध पोलीस ठाण्यांत शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल
राहुरी (प्रतिनिधी) – खून, दरोडे, महामार्गावरील जबरी चोरी अशा अनेक गुन्ह्यात चौदा- पंधरा वर्षांपासून फरार असलेला कुविख्यात गुन्हेगार बल्ली ऊर्फ बाबासाहेब भाऊसाहेब साळवे (रा. शिंगवे नाईक, ता.नगर) यास जेरबंद करण्यात राहुरी पोलीस पथकाला यश आले आहे. राहुरी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल राहुरी पोलीस पथकाला जिल्हा प्रभारी अधीक्षक सागर पाटील यांनी विशेष बक्षीस जाहीर केले आहे.
पोलीस अप्पर अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी परिसरातील जंगल परिसरात तो राहत होता. वेषांतर करून अनेक गुन्हे त्याने केलेले आहेत. म्हैसगाव परिसरात काल रात्री तो येणार अशी खबर पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाल्यानंतर त्या परिसरात सापळा लावला.
रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकलवर भरधाव वेगात तो जात असल्याची खात्री पटताच राहुरीच्या पोलीस पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. पथकात पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचेबरोबर सोमनाथ जायभाय, प्रवीण खंडागळे, आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे आदींचा समावेश होता. पाठलाग सुरू आहे याचा सुगावा लागताच मोटारसायकल सोडून तो परिसरातील जंगलात पळू लागला.
काही अंतरावर तो अडखळला, त्यावेळेस पोलिसांनी झडप घालून त्यास पकडले. त्याचेकडून धारदार चाकू जप्त केला गेला. राहुरी, एमआयडिसी, पारनेर, लोणी, राहाता, कोपरगाव अशा अनेक ठिकाणी त्याचेवर शंभरपेक्षाही अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीच्या पथकाने ही कामगिरी केली.