निळवंडेच्या पाण्याला विरोध असल्याची अफवा
कोपरगाव (प्रतिनिधी) – शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटला पाहिजे. नागरिकांना दररोज मुबलक पाणी मिळाले पाहिजे. मग ते पाणी कोठूनही येऊ द्या, अशी प्रतिक्रीया आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
आमदार काळे यांनी तालुक्याच्या पाणी प्रश्नावर अधिवेश काळात सभागृहामध्ये लक्ष वेधले होते. यावर चर्चा करताना ते म्हणाले, तालुक्यातील सिंचनासह शहराच्या पिण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. याबद्दल मी प्रयत्न करतोय. तालुक्याची पाण्याची स्थिती वरिष्ठांना समजावून सांगितली आहे. अनेक वर्षे प्रलंबीत पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवून पाण्यावरुन जो प्रादेशिक वाद सुरू आहे, तो मिटला पाहिजे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील यांना भेटून गोदावरी खोऱ्याचे पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.
यापूर्वी वर्षानुवर्षे गोदावरीचे पाणी कोपरगावकरांना बारमाही देण्यात आले होते. बारमाही पाणी देण्याच्या नावाखाली या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सिलिंग कायद्याखाली काढून घेण्यात आल्या. पुढे बारमाही मिळणाऱ्या पाण्यामध्ये 50 टक्के कपात करण्यात आली. समन्यायी पाणीवाटपामुळे प्रादेशिक वाद निर्माण झाला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होतोय, असे भावना झाली आहे. हा पाण्याचा प्रश्न वरिष्ठांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर या सर्वांना हा गंभीर असून, त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, अशी सहमती दर्शवली आहे, तशी भूमिका सर्व वरिष्ठांची असल्याचेही काळे यांनी सांगितले.
दरम्यान शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाच्या खोदकामासाठी समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने कोपरगाव पालिकेकडे कागपत्राची मागणी केली आहे. त्यासाठी मी ही सकारात्मक आहे. निळवंडे धरणातून बंद पाईपलाईनच्या पाण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचा प्रस्ताव तयार आहे. दोन्ही गोष्टी होऊद्या. कुठून का पाणी येईना पण शहराला मुबलक पाणी येऊ द्या, असे सांगत मी निळवंडेच्या पाण्याला कधीच विरोध केला नाही. उलट न्यायालयाने निळवंडेच्या पाइपलाइन संदर्भातली स्थगिती उठवली. त्यावर पालिकेने त्वरित न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याच्या सूचनाही आपण मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना केल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली.
आशुतोष काळे निळवंडे धरणातुन कोपरगावला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेला विरोध आहे अशी चर्चा मतदार संघात सुरू होती. यावर काळे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले मी निळवंडेच्या पाण्याला विरोध करायचे कारण नाही. शहराला पिण्यासाठी पाणी कोठून ही येऊ द्या. पण पाणी येऊ द्या, अशी माझी भूमिका आहे, असे म्हणत निळवंडेला विरोध नसल्याचे त्यांनी जाहीर केले.