– हिमांशू
सगळीकडे एकच चर्चा. लाट कुणाची? देशात कुणाची? राज्यात कुणाची? सर्वाधिक लोकप्रिय कोण? कुणाची लाट कोण अडवणार? राज्यात जे होणार तेच देशात होणार की देशात जे होणार तेच राज्यात होणार? 4 जूनपर्यंत हेच चालू राहील. त्यानंतर काय होईल, हा चर्चेचा विषयच नाहीये. ज्यांना 4 जूनचं विशेष महत्त्व वाटत नाही, त्यांना 26 मे महत्त्वाची आहे. ‘आपली’ टीम त्या दिवशी पिचवर असेल का आणि असलीच तर ‘आयपीएल’ची ङ्गायनल जिंकेल का, याची त्यांना उत्सुकता लागलीये.
म्हणजे, एकीकडे लाट आणि दुसरीकडे ‘ङ्गीवर’ अशी परिस्थिती! पण यंदा ‘इंडियन प्रीमिअर लीग’पेक्षा ‘इंडियन पॉलिटिकल लीग’ अधिक लक्षवेधी ठरलीय. राज्यात तर खूपच! कारण काहीजण तिकीट न मिळताच गाडीत बसलेत तर काहीजणांना तिकीट मिळूनसुद्धा गाडी सुरू होईना, अशी विचित्र स्थिती आहे. ‘कार्यकर्ता’ नावाचा भान हरपून लढणारा योद्धा मात्र अंधाधुंद दांडपट्टा ङ्गिरवायला लागलाय. चार ङ्गुटाच्या पलीकडचं दिसू नये इतकं धुकं असताना ड्रायव्हरची जी परिस्थिती होते, तीच कार्यकर्त्याची झालीय.
आपल्या नेत्याच्या पलीकडे कुणाचीच लाट नाही, असं त्याचं प्रामाणिक मत आहे. नेते मात्र ‘लाट कुणाची’ याविषयी विचित्र भाष्य करून एकतर वाद ओढवून घ्यायला लागलेत किंवा स्वतःची लाट निर्माण करण्यासाठी स्वतःच पाणी ढवळायला लागलेत. मतदान तोंडावर आलं तरी ह्यांची आंधळी-कोशिंबीर सुरूच!
असो, तर ‘कार्यकर्ता’ नावाच्या हाडामासाच्या माणसाला ‘लाट कुणाची’ याविषयी काही मौलिक माहिती देण्याचा आमचा हेतू आहे. सगळ्यात मोठी लाट आहे उष्णतेची… आणि वातानुकूलित गाडीत बसणार्या तुमच्या नेत्याचं डोकं थंड आहे, एवढंच लक्षात ठेवा. सभेच्या मंचावरही बर्याच ठिकाणी एसी, कूलर लावलेले असतात. तुमच्यावर मात्र ‘भाषणं प्लस उष्णता’ असा दुहेरी परिणाम होतोय.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर अशा काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी झालाय. कोल्हापूर, परभणी, नगर, हिंगोली, नांदेडमध्येही उन्हाचा कडाका अचानक वाढण्याची चिन्हं आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनो, प्रचाराच्या धामधुमीत स्वतःला जपा. पक्षाचं, नेत्याचं नाव असलेल्या का होईना टोप्या घाला. वरचेवर पाणी प्यायला विसरू नका, कारण उन्हाबरोबरच घोषणांनीसुद्धा तुमचा घसा कोरडा पडणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, रणांगणात लढाई सुरू असून आपण योद्धे आहोत, हा अवास्तव आविर्भाव डोक्यातून काढून टाका. कारण उष्णतेच्या लाटेचे तुमच्या शरीराबरोबरच मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. उष्णतेमुळे समाधान, आनंद कमी होतो आणि आक्रमकता, चिडचिडेपणा वाढतो, हा संशोधनांती काढलेला निष्कर्ष आहे.
काही कार्यकर्ते वयस्क असतात. मुळातच शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीय आव्हानांचा सामना करत असतात. त्यांनी अधिक जोशात येऊ नये, हेच बरं! समुद्रकिनारी प्रदेशात 37 अंश, पठारी भागांत 40 अंश तर डोंगराळ भागात 30 अंशांच्या वर तापमान गेलं, तर त्याला उष्णतेची लाट म्हणतात. शिवाय, एखाद्या भागातलं तापमान सरासरीपेक्षा साडेचार ते साडेसहा अंशांनी वाढलं, तरी ती उष्णतेची लाटच असते. अशावेळी थकवा लवकर येतो. थकव्यापाठोपाठ नैराश्य, चिंता, आक्रमकता येतेच. तेव्हा कार्यकर्त्यांनो, जरा थंड घ्या..!