हिमांशू
चंद्रपूरचं तापमान देशात सर्वाधिक झालंय. एप्रिल महिना सुरू होता-होताच आपल्याकडे उष्मा असह्य झालाय. नागपूरपासून मुंबईपर्यंत आणि पुण्यापासून रत्नागिरीपर्यंत सगळीकडेच उन्हाचे चटके तीव्र झालेत. अजून दोन महिने (पाऊस लांबला तर त्याहून अधिक काळ) ही काहिली आपल्याला सहन करायची आहे. एअर कंडिशन्ड घरात राहून एसी गाडीतून एसी ऑफिसमध्ये जाणाऱ्यांचा अपवाद वगळला, (होय, अजूनही असे लोक “अपवाद’च आहेत; “नियम’ झालेले नाहीत) तर प्रत्येकजण शेंगदाण्यासारखा भाजून निघणार आहे.
का कुणास ठाऊक… कुणी “नॉस्टेल्जिक’ म्हटलं तरी चालेल; पण अशा वेळी पाठीला डोळे फुटतातच. ही अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी नव्हती हे मान्य करावंच लागेल. ऐंशी आणि नव्वदच्या दशकापासून परिस्थिती बिघडत गेली हे छातीठोकपणे सांगता येतं. तत्पूर्वी नवरात्राच्या आधी रीतसर हिवाळा सुरू होत असे. संक्रांतीनंतर तापमान हळूहळू वाढत जात असे. ते कितीही वाढलं तरी पंख्याचं वारं पुरेसं ठरत असे. शिवाय वळीवाचा पाऊससुद्धा “वेळेवर’ पडून ऊष्मा नाहिसा करत असे. आता प्रत्येक ऋतू तीव्र… उन्हाळ्यात उष्म्याची आणि हिवाळ्यात थंडीची लाट… पावसाळ्यातले पावसाचे दिवस कमी आणि एकाच दिवसात प्रचंड पाऊस पडण्याचं प्रमाण जास्त! याखेरीज गारपीट, अवकाळी पाऊस, चक्रीवादळं, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तींची संख्या पन्नास वर्षांत प्रचंड वाढली. सध्याचा असह्य उन्हाळा हाही निसर्गाचा प्रकोपच!
या परिस्थितीची कारणमीमांसा कितीही टाळली तरी ते “कोंबडं झाकणं’ ठरेल. माणसाने आपले पराभव आणि आपली हाव नेहमी लपवली आहे. आम्हाला सात पिढ्यांचं कमावून ठेवायचंय; मग बेशक सातवी पिढी कशी का जगेना! सात पिढ्यांचं सोडा, पुढच्याच पिढीचं जगणं अवघड होऊन बसेल की काय, अशी धास्ती जाणकारांना वाटू लागलीय. तथाकथित विकासाच्या मार्गात निसर्ग नेहमी “अडसर’ ठरला आणि आपण तो बाजूला केला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत आपण देशाच्या विविध भागांमधील 30 लाख 97 हजार 721 झाडं तोडली. विनापरवाना वृक्षांच्या कत्तलीची आकडेवारी वेगळीच! गेल्या पाच वर्षांत आपण देशभरातील 1 कोटी 20 लाख झाडं नियमानुसार परवानगी घेऊन तोडली.
नियमानुसार झाडं तोडणाऱ्यांना “भरपाई’ म्हणून वृक्षारोपण करावं लागतं. अशी “भरपाई’ म्हणून जी रोपं लावली होती, त्यातली 24 टक्के झाडं विविध कारणांमुळे नष्ट झाली. मुख्य म्हणजे “भरपाई’ म्हणून झाडं लावताना स्थानिक परिसंस्थेचा अजिबात विचार केला जात नाही. ज्या झाडांना गाईगुरं तोंड लावत नाहीत, पाणी फारसं द्यावं लागत नाही, अशी परमुलुखातली झाडं विचार न करता लावली जातात.
आग ओकणाऱ्या या उन्हाळ्यानंतर पावसाळा येईल आणि वृक्षारोपणाचा “सीझन’सुद्धा येईल. “वृक्षारोपण करताना’ अशी कॅप्शन देऊन महनीय व्यक्ती वृक्षारोपण करतील. काही झाडं पावसानं ओढ दिल्यामुळे मरतील तर काही अतिवृष्टीमुळे! जी जगतील ती तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या तुलनेत नगण्य असतील. मुळात वृक्षारोपणानं “भरपाई’ केली तरी नुकतीच लावलेली झाडं तोडलेल्या वृक्षाएवढी व्हायला किती वर्षे लागतील? पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाला आता याविषयी गंभीर व्हावंच लागेल, कारण सगळं गळ्याशी आलंय!