हिमांशू
“दैव देतं आणि कर्म नेतं’ या उक्तीचा कुणी अर्थ विचारला तर यापुढे पंजाब कॉंग्रेसकडे बोट दाखवायला अजिबात हरकत नाही. अवघ्या जगाला घास भरवणाऱ्या बळीराजानं सत्तेचा घास कॉंग्रेसच्या अगदी तोंडापाशी आणून ठेवला होता आणि नेमक्या त्याच वेळी बोलघेवड्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी “बॅटिंग’ सुरू केली. त्यांना खूश करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची, निवडणुकीच्या तोंडावर उचलबांगडी केली. त्यांच्या जागी चरणजीतसिंग चन्नी यांची वर्णी लागली. मोठ्या आशेने कॉंग्रेसनं मागासवर्गीय कार्ड खेळलं; पण परिणाम काय झाला?
पंजाबच्या लोकांनी नवज्योतसिंग सिद्धूंच्या तोंडाला कुलूप घातलं, अमरिंदरसिंग यांनाही घरी बसवलं आणि चन्नीही पराभूत झाले. दिल्लीच्या वेशीवर वर्षभर घरघरणारे ट्रॅक्टर काय करू शकतात, याची जाणीव लोकांनी भाजपला करून दिली. (अर्थात भाजपने अपेक्षा ठेवली नव्हतीच.) पंजाबवर दीर्घकाळ दबदबा असलेल्या शिरोमणी अकाली दलाचीसुद्धा डाळ शिजली नाही आणि आम आदमी पक्षानं (आप) 117 पैकी 93 जागा जिंकून इतिहास घडवला. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली 16 तारखेला अस्तित्वात येणारं नवं सरकार पंजाबला नशामुक्तीकडे नेईल; बेरोजगारी कमी करेल अशी आशा लोकांमध्ये दिसते. दिल्लीप्रमाणं लोकांना “मोफतचं आमिष’ दाखवल्याचा आरोप भाजपला “आप’वर पंजाबात करता येईना, कारण मोफत रेशनच्या जाहिराती उत्तर प्रदेशात आणि मोफत लसीच्या जाहिराती देशभर धूमधडाक्यात चाललेल्या!
असो, बोलघेवडेपणामुळे सत्ता मिळते किंवा टिकते ही अंधश्रद्धा आहे, हा पंजाबने महाराष्ट्राला दिलेला धडा आहे, असं समजून एका वेगळ्या मुद्द्याकडे वळूया. आम आदमी पक्ष खरोखर “आम’ आदमींचा आहे का? असा प्रश्न विचारणारे पावलोपावली भेटतात. याचं कारण असं की, शेतकरी सदोदित बापुडवाणाच दिसला पाहिजे, त्याच्याकडे पैसाअडका असताच कामा नये, हे जसं आपण गृहित धरलंय तसंच “आम आदमी’ याचा अर्थ “फाटका माणूस’ हेही गृहित धरलंय. वकील, अभियंते, डॉक्टर, कारखानदार हेही “आम’ असू शकतात, यावर आपला विश्वासच नाही. परंतु आपल्या दृष्टीनं जो “आम’ आहे, अशा माणसानं पंजाबात मोठ्ठा पराक्रम केलाय. सत्ताधारी पक्षाच्या विद्यमान आणि धनवान मुख्यमंत्र्यांना हरवण्याची किमया खरोखर एका फाटक्या माणसानं करून दाखवलीय.
मुख्यमंत्री चन्नी यांचा भादौर मतदारसंघातून पराभव करणारे लाभसिंग उगोके हे खरोखर “आम’ म्हणजे अतिशय गरीब आहेत. चन्नींची मालमत्ता जवळजवळ आठ कोटींची तर लाभसिंग हा दोन खोल्यांच्या घरात राहणारा माणूस. वडील मजूर आणि आई शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी. पोटासाठी प्लंबरचा कोर्स केल्यानंतर लाभसिंग मोबाइल दुरुस्ती शिकले. आज ते हेच काम करतात आणि 2014 चं मॉडेल असलेल्या दुचाकीवरून फिरतात. याहीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, त्यांनी केलेली इतिहासाची पुनरावृत्ती. भदौरमध्ये 1952 मध्ये राजा पराभूत झाला होता तर बैलगाडीतून प्रचार करणाऱ्या अर्जनसिंग नावाच्या गरीब उमेदवाराला भदौरच्या जनतेनं कौल दिला होता. त्या काळात एक लाख रुपये खर्च करूनसुद्धा राजा पराभूत झाला. लोकशाहीत तर मतदार हाच राजा असतो, हे भदौरच्या उमेदवारांनी मुख्यमंत्री चन्नी यांना दाखवून दिलं. पैशांशिवाय निवडणुका खेळता येत नाहीत, ही मानसिकतासुद्धा आपण वेळीच बदललेली बरी!