नामदेव ढाके : पाणी पुरवठ्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न
पिंपरी – शहरातील नागरिकांसाठी पाणी पुरवठा सुलभ होण्याकरीता महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपाने हा प्रश्न मार्गी लावला. महाविकास आघाडी सरकारने 15 वर्षे सत्ता भोगूनही या विषयाकडे दुर्लक्ष करीत बघ्याची भूमिका घेवून विरोध कायम ठेवला. या महाविकास आघाडीला जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसल्याचे यातून दिसून येते. भाजपाने कुठलीही दिरंगाई न करता हा प्रश्न सर्वप्रथम मार्गी लावून दररोज पाणी पुरवठ्यासाठी सत्तेत आल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत नियोजन केले असल्याचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.
चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्र प्रकल्पाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे यांच्यासह सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
लोकसंख्या वाढीचा दर आणि शहराच्या विकासाच्या वाढीचा वेग लक्षात घेऊन महापालिकेने आंद्रा व भामा आसखेड धरणातून 97.661 दशलक्ष घन मीटर पाणी कोटाची शासनाकडून मान्यता घेतली आहे. जलशुध्दीकरण केंद्रे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, असे नामदेवक ढाके यांनी सांगितले.