हिमांशू
आम्ही राजकारणावर बोलून पाहिलं… अगदी विनाकारण! पाच राज्यांमधल्या निवडणुकीचे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा कल सांगतात का? या प्रश्नावर आसपासच्या इतरांप्रमाणेच काहीही कळत नसताना ठाम मतं मांडली. आम आदमी पक्ष “राष्ट्रीय’ होऊ शकेल का? भाजपला पर्याय देऊ शकेल का? यावर अगदी ज्योतिषासारखं बोललो. केवळ राष्ट्रीयच नव्हे आंतरराष्ट्रीय राजकारणातलेही आम्ही सध्या तज्ज्ञ झालो आहोत. युक्रेन-रशिया युद्ध किती दिवस चालेल? तिसरं महायुद्ध खरंच होईल का? युद्धात नाटो उतरल्यास काय होईल? चीन हस्तक्षेप करेल का? वगैरे प्रश्न आम्ही नॉनस्टॉप चघळू शकतो. दरम्यानच्या काळात आम्ही उत्तम समीक्षकसुद्धा झालो. “गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटावर विचार मांडतो ना मांडतो, तोच “झुंड’ आला.
आम्ही पुन्हा अकलेचे तारे तोडले. “काश्मीर फाइल्स’ आल्यावर तर आम्ही चित्रपटांबरोबरच काश्मीर विषयाचेही तज्ज्ञ झालो. काश्मीरचा तिढा नेमका कुणामुळे निर्माण झाला? पंडितांचं सामूहिक विस्थापन कुणामुळे झालं? काश्मीर खोऱ्यात 1989-90 च्या दरम्यान सुरू झालेला हिंसाचार खरोखर दडपला गेला का? आदी विषयांवर आम्ही जे काही बोललो, ते ऐकून श्रोत्यांनी एकच प्रश्न विचारला… “”तुम्ही किती वर्षे काश्मीरमध्ये होता?” बस्स! आणखी काय हवं आपल्याला? “पंडित पुन्हा काश्मीर खोऱ्यात राहायला जातील का?’ एवढा एकच प्रश्न ऑप्शनला टाकून बाकी सगळं धडाधड बोलून टाकतो आम्ही हल्ली!
महाराष्ट्रातली राजकीय “पकडापकडी’ असो नाहीतर कर्नाटकमधला हिजाबचा वाद असो, “श्रीवल्ली’वर डान्स करणाऱ्यांची यादी असो किंवा दाऊदशी संबंध असलेल्या-नसलेल्यांची यादी असो, आम्हाला तूर्तास कोणताही विषय वर्ज्य नाही. आम्ही वृत्तवाहिन्यांवरील चर्चा वगैरे पाहतो (हो, “पाहतो’ कारण ऐकू येतच नाहीत) आणि प्रत्येक विषयावर बोलतो. फक्त “सगळ्याच वाहिन्या नंबर वन कशा?’ या जटिल प्रश्नाचं उत्तर शोधायला जात नाही. टीआरपीच्या कथित घोटाळ्यापासून नीरव मोदीच्या घोटाळ्यापर्यंतचे विषय आता खूप मागं गेलेत. एखाद्या क्रिएटिव्ह दिग्दर्शकाला जशी चित्रपटांसाठी नवनवीन विषयांची भूक असते, तसे आम्ही एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे चर्चेसाठी ताजे-ताजे विषय शोधून काढतो. कधी-कधी आमचं आम्हालाच आश्चर्य वाटतं.
आपण एकाएकी एवढे ज्ञानी, एवढे हुशार, एवढे फर्डा वक्ते आणि (सोशल मीडियावर का होईना) सिद्धहस्त लेखक कसे झालो? हे आवरण आपल्यावर कधी आणि कसं चढलं? या आवरणाच्या आत आहे तरी काय? खोल-खोल काही निगेटिव्ह तर नसेल ना..? चारचौघांत लांबलचक बाता मारत असताना आतून ही भीती कशाची वाटते? खरंतर कोविड संपल्यावर आपण सुसाट धावत सुटलो. गेला महिनाभर तरी आपला उत्साह यत्किंचित कमी झाला नाही. कोविडकाळातला सगळा बॅकलॉग भरून काढला आपण!
पण ही रुखरुख कशाची? काय दडपतो आहोत आपण मनाच्या तळकप्प्यात? कोविडकाळात उमगलेलं सत्य? आपलं अस्तित्व किती नाजूक असतं, याचं मिळालेलं ज्ञान? की पुन्हा दिसू लागलेली तीच चित्रं? का आपण तेवढ्याच विषयाकडे कानाडोळा करतोय? त्या चित्रांचा कंटाळा आला म्हणून? चीनमधली दृश्यं युक्रेनमधल्या दृश्यांपेक्षा भयानक का वाटतायत? चीनमध्ये पुन्हा घरात कैद झालेली अडीच कोटी माणसं आपल्याला काय सांगू पाहतायत? त्यांचा आवाज आधी पोहोचेल की विषाणू?